कर्जत – कर्जत तालुक्यातील विविध भागात कांदा पीक घेण्यात आले. मात्र सध्या कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. कांद्याच्या भावात वाढ झाल्याने अनेक शेतकरी नव्याने कांदा पिकाकडे वळले आहेत. मात्र रोगाच्या प्रादुर्भावामुळे पीक हातातून चालले आहे.
बदलत्या हवामानामुळे पिकांना रोगाने ग्रासले जात आहे. चालूवर्षी मका पिकाचे लष्करी अळीने प्रचंड नुकसान झाले. आता कांदा पिकावर रोग पडल्याने शेंडे जळू लागले आहेत. पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. कीटकनाशकांच्या फवारणीचाही तितकासा परिणाम होताना दिसत नाही. रोपांची खरेदी, खते तसेच कीटकनाशके यावर मोठा प्रमाणात खर्च करूनही पीक हातात येण्याच शक्यता धूसर होत चालली आहे.