राहुल गणगे
पुणे -गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. प्रत्येक पक्ष, नेता आपापली भाषा बोलू लागला आहे. या कुरघोड्यांमध्ये सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे महत्त्वाचे प्रश्न मात्र बाजूला राहिले आहेत. राज्यात सध्या फक्त वेगवेगळ्याविषयांवर राजकारण सुरू आहे. या राजकीय साठमारीत महागाईचा आवाज दबला असल्याचे दिसून येत आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या मानगुटीवर महागाईचे भूत बसल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत, मात्र याबाबत लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष चिडीचूप असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. पेट्रोलपेक्षाही अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही दैनंदिन महाग होत आहेत. भाजीपाला, कांदा-बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव इतके वाढले आहेत की, त्यामुळे सर्वसामान्य माणसांना जीवन जगणे कठिण झाले आहे. परंतु याबाबत कोणताही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी अजिबात आवाज उठवण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.एक काळ असा होता, महागाई विरोधात मोर्चे निघायचे. घंटानाद व्हायचे. थाळीमोर्चे निघायचे. परंतु आज कामगार संघटनाही बोलत नाहीत. गृहिणींचे मोर्चे निघत नाहीत. आज असे रस्त्यावर उतरणारे नेतृत्व नसल्यामुळे आहे ती परिस्थिती सामान्यांना स्वीकारावी लागत आहे. सगळेजण जणू आपलेच दात, आपलेच ओठ म्हणून गप्प बसत आहेत.
राज्यातील राजकारण दिवसेंदिवस खालची पायरी गाठत आहे. एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या पक्षांतील नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. जाती-धर्माच्या नावावर राजकारण ढवळून निघत आहे. आपापल्या नेत्यांवरील आरोपांना कार्यकर्ते उत्तरे देत आहेत. राजकारण्यांची वैयक्तिक आरोपांपासून घरातील सदस्यांवर आरोप करण्यापर्यंत मजल पोहचली आहे. देवाच्या नावावर वातावरण पेटवले जातआहे. नेत्यांपासून निघालेले हे विषय आता गावागावात,वाड्यावस्त्यांवर पोहचले असल्याने दिल्ली ते गल्लीपर्यंतचर्चांना उधाण आले आहे. आपलाच नेता कसा खरा आहे?
हे इतरांना पटवून देण्यासाठी कार्यकर्ते गावागावांत काम करताना दिसत आहेत.करोनामुळे अनेक व्यवसाय संकटात येऊन बंदपडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांच्या घरातीलसदस्य, काहींच्या घरातील कर्ता माणूस गेला. अशा अनेक अडचणींवर मात करीत सर्वसामान्य माणूस दिवस काढत आहे. सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्षांनी लोकांच्या विविध समस्या व अडचणी लक्ष घालून सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्येकजण सध्या एकमेकांची जिरविण्यासाठी आखाड्यात उतरल्याचे दिसून येत आहे.
तू आण दगडं अन् मी आणतो लाकडं…
पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल, किराणा, पालेभाज्या, फळभाज्या व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला महागाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. मात्र, महत्त्वाच्या विषयांकडे पाहण्यासाठी व बोलण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. गॅसचे दर गगनाला भिडल्यामुळे तू आण दगडं, मी आणतो लाकडं, आपण करु दोन घासासाठी काबाडकष्ठ, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी 120 रुपये किलो दराने तेल खरेदी केले होते. आता 170 ते 190 रुपये भाव झाला आहे. तर इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आर्थिक चणचण भासत आहे. निवडणुकीवेळी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु महागाई कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. याबाबत कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही.
– विशाल कदम, नागरिक, कदमवाकवस्ती