नवी दिल्ली – भारतातील महागाईचा दर चिंताजनक असून अशियातील अन्य अर्थव्यवस्थांमध्ये भारताची ही स्थिती अपवादात्मक आहे असे निरीक्षण मुडी या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने नोंदवले आहे. भारतात इंधनाचे दर चढे आहेत. त्यामुळे महागाईला यापुढील काळातही चालनाच मिळणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात रिटेल महागाईच्या दराने पाच टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. रिटेल महागाईच्या दरात होणाऱ्या वाढीचा प्रभाव रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणावर पडत आहे. कोअर इन्फ्लेशन मध्येही वाढ होऊन हा दर 5.6 टक्क्यांच्यावर गेला आहे. ही सारी स्थिती चिंता करावी अशीच आहे असेही मुडीने म्हटले आहे. अशियातील अन्य देशांमध्ये मात्र या पेक्षा वेगळी स्थिती असून तेथे महागाईचा दर कमी होताना दिसत आहे. पण या स्थितीला भारत आणि फिलिपाईन्स हे देश अपवाद ठरत आहेत असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.