कोरेगाव भीमा -बांधकाम क्षेत्रावर महागाईचे संकट अद्यापही घोंगावत आहे. नोटाबंदीनंतर अडचणीत आलेल्या बांधकाम क्षेत्राला करोना व त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा या क्षेत्राला आणखीच फटका बसला. परिणामी बांधकाम क्षेत्राला घरघर लागली आहे.
बांधकाम साहित्याचा तुटवडा, परप्रांतीय मजूर, गवंडी, सेंट्रिंग काम करणारे, कामगार गावी गेल्याने मोठ्या प्रमाणात कामगारांचा तुटवडा जाणवला. त्यामुळे स्थानिक कामगारांना मागणी वाढली.
त्याचबरोबर पेट्रोल, डीझेल, भाजीपाला, किराणा यांच्या किंमती झपाट्याने वाढल्याने त्याचा परिणाम मजुरीवर झाला आहे. त्यातच भर म्हणून मोठ्या प्रमाणात बांधकामाचे साहित्य महाग झाल्याने घरमालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे, महिनाभराच्या कालावधीत बांधकाम साहित्यामध्ये 30 ते 35 टक्यांची वाढ झाली आहे.
घराचे बांधकाम करण्यासाठी सिमेंट, लोखंड, विटा आदी साहित्यांबरोबरच मजुरिही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच दरवाजे, खिडक्या तसेच काच व विविध प्रकारच्या साहित्याची व त्यासाठी आवश्यक मजुरांची मजूरीही वाढली आहे. याचा फटका नव्याने घर बांधणाऱ्या, फ्लॅट घेणाऱ्या, घरांची दुरुस्ती करणाऱ्यांनाही बसत आहे.
एका म्हैन्यात सिमेंटचा भाव वाढल्याने बांधकाम खर्चात मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सिमेंटचे भाव वाढत असताना ऑक्टोबर महिन्यात सिमेंटचे दर दोन ते तीनदा वाढले. सद्य:स्थितीत इमारत साहित्याच्या काही दुकानांमध्ये सिमेंट प्रति बॅग दर वाढले आहेत. किमान 30 ते 40 रुपये किंमत वाढली आहे.
कलर एशियंट पेंट 255 लीटर आत्ता 385 लीटर सर्व साहित्यात किमान 20 ते 30 टक्के वाढ झाली असून नवीन बांधकाम करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सप्टेंबर महिन्यापूर्वी 12-10 एमएमचा लोखंड प्रति क्विंटल 5 हजार 400 रुपये दराने विकला जात होता. आता हा दर क्विंटलमागे 6 हजार 100 रुपये पोहोचला आहे. 8 एमएमचा लोखंडासाठी एका क्विंटला सध्या 6 हजार 400 रुपये मोजावे लागत आहेत.
मजुरीचे दरही वाढले
लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर, कामगार त्यांच्या गावी परतले. परंतु 60 टक्के मजूर परतलेच नाहीत. त्यामुळे स्थानिक मजूर, कामगारांकडून काम करून घेताना त्यांचाही रोज बऱ्यापैकी वाढला आहे. साध्या बांधकाम कामगाराला गेल्या वर्षापर्यंत 400 ते 500 रुपये मजुरी मिळत होती. तो आता 700 रुपयांपर्यंत वाढला आहे. गवंडी 700 ते 900 रुपये रोज घेत होते. आता ते 1500 ते 2000 मागणी करतात.टाईल्स बसविणाऱ्यांची मजुरी 700 रुपयांवरून 1 हजार, अकराशेपर्यंत पोहोचला आहे.
बांधकाम साहित्याचे दर वाढले असल्याने नवीन बांधकाम सुरू होण्यावर मोठा परिणाम झाला आहे.सर्वच बाबतीत महागाई अशीच राहिल्यावर या क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात बांधकामे सुरू होत आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण बांधकाम करीत असल्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे.
– दिनकर गव्हाणे, बांधकाम व्यावसायिक कोरेगाव भीमा