मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात. वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. त्यामुळे भाजपला शुद्धीकरणाची गरज आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा टोला लगावला. गेल्या दोन वर्षापासून अती झालं. महाराष्ट्रात आणि देशात बांगलादेशी घुसतात संपूर्ण देश खराब करतात. भाजपमधील घुसखोरांनी तसंच केलं आहे. भाजपच्या शुद्धीकरणाची गरज आहे. हा खूप मोठा पक्ष आहे. हिंदुत्वासाठी या पक्षाने मोठं काम केलं आहे.
आम्ही 25 वर्षे त्यांच्यासोबत होतो. त्यांचं योगदान आम्ही जाणून आहे. पण ज्यांना हे माहीत नाही, जे बाहेरून आले आहेत, ते लोक शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. देशासाठी बनलेला कायदा आहे. मग ती ईडी असो की सीबीआय असो. आम्ही जे आज लिहिलं. त्यात तथ्य आहे. आणि देशभरात त्यावर मंथन चालेल आणि चालणार, असं ते म्हणाले.
आता कोणी तरी बाहेरचा माणूस येतो शिवसेना भवनावर दगड मारू म्हणतो, कोणी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारू म्हणतो. हे मूळ भाजपचा माणूस बोलणार नाही, हे बाहेरचे बाडगे बोलतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे कधी बोलणार नाहीत. हे सगळे बाहेरून आलेले लोकं आहेत. महाराष्ट्रात, देशात बांगलादेशचे घुसखोर आणि पाकिस्तानचे घुसखोर हैदोस घालतात आणि आपण त्यांच्याविरोधात कारवाया करतो. महौल बिघडवतात. तसंच भाजपमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी माहौल बिघडवत आहेत, असे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्य दिनाचा हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव समजून सांगण्यासाठी भाजपकडून पत्रं लिहिली जाणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अच्छा पत्रं लिहिणार आहेत. त्यांना लिहिता वाचताही येतं? चांगली गोष्ट आहे. आम्हाला स्वातंत्र्य संग्रामाबाबत सांगायची गरज नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र दोन्ही राज्ये क्रांतीकारकांची भूमी आहे.
मिस्टर नारायण राणे हे बंगालचा आणि महाराष्ट्राचा अवमान करत आहे. बंगाल आणि महाराष्ट्राच्या योगदानाची ज्या मंत्र्याला माहिती नाही, ते आम्हाला स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगत आहेत. त्यांनी आधी इतिहास वाचावा. भाजपने त्यांना इतिहासाचं पुस्तक द्यावं, असा टोला त्यांनी लगावला.
तुम्ही लेटर पॉलिटिक्स करा किंवा गटर पॉलिटिक्स करा. पण आमच्या सोबत सामना करणं अशक्य आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही करत राहा. ही तुमची वैफल्यग्रस्तता आहे. तुमचं नैराश्य असं काढू नका. तुम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी चांगलं आणि विधायक काम करा. अशा प्रकारची भाषा करू नका. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात. आम्ही सहन करतो. तुम्हीही सहन करा, असं त्यांनी सांगितलं.
राजकारणात केवळ वैचारिक मतभेद असतात. मिस्टर राणेंनी जे सुरू केलं. त्याला वैचारिक मतभेद म्हणत नाहीत. ते वैयक्तिक दुश्मनी काढत आहेत. कोणीही कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने व्यक्तिगत दुश्मनीसाठी काम करू नये. तुम्ही तुमचं विधायक काम करा. तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढत आहात. प्रत्येक राज्यात ही यात्रा सुरू आहे. कोणत्या राज्यात वाद झाले. केवळ महाराष्ट्रात का? याबाबत भाजच्या नेत्यांनी कधी विचार केला का? तुमच्यात एवढी गुर्मी असेल तर गाझीपूरमध्ये शेतकरी बसले आहेत. जाऊन त्यांच्यासोबत बोला, असा हल्ला त्यांनी चढवला.
सभ्य भाषेत टीका असेल तर स्वीकारली जाईल. टीकेला धार असेल तर तीही स्वीकारली जाईल. तुम्ही कमरेखालची टीका केली तर याद राखा. कमरेखाली तुम्हीही आहात. आमच्याशी भाषेशी बरोबरी करू नका. आम्ही लिहिणारे बोलणारे आहोत आणि सर्वकाही करणारे आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.