नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यात सीमावाद पुन्हा एकदा पाहण्यास मिळाला आहे. याआधीच पूर्व लडाखमधील सीमावादावरुन भारत-चीनमध्ये तणाव असतानाच चिनी सैन्याने उत्तराखंडात घुसखोरी करून भारतीय लष्कराने बांधलेला नवीन पूल उध्वस्त केल्याची घटना घडली असल्याचे समोर आले आहे. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या या वृत्ताला सरकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
उत्तराखंडलगतच्या बाराहोती भागात चीनच्या 100 सैनिकांनी 55 घोडय़ांसह ‘तून-जून ला’ ओलांडत भारतीय हद्दीत 5 किलोमीटर आत घुसखोरी केली. आणि परतताना भारतीय लष्कराने बांधलेला नवीन पूल उध्वस्त केला. दरम्यान, चिनी सैन्याने घुसखोरी केल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्य घटनास्थळावर दाखल झाले. मात्र, तोपर्यंत चिनी सैन्य माघारी परतले होते.