– तुषार धुमाळ
वाघळवाडी – बारामती तालुक्यातील वाघळवाडी, सोमेश्वरनगर, दहा फाटा, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बुद्रुक, पणदरे, माळेगाव बुद्रुक, शारदानगर, मोरगाव या ग्रामीण भागातील मुख्य गावांमध्ये परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे येत असल्याचे निदर्शनात येत आहे. हे परप्रांतीय आता ग्रामीण भागातील स्थानिकांचा रोजगार हिरावून त्यांच्या पोटावर लाथ मारत असल्याचे स्थानिक कामगारांचे म्हणणे आहे.
बांधकाम व्यवसायावर अवलंबून असलेले उद्योग गवंडी, सेट्रिंग, वायरिंग, प्लंबर, रंगारी,सुतार, हमाल, विटभट्टी , बर्फ कारखाना,मिठाई दुकान कामावर परप्रांतीय कामगारांनी कब्जा केलेला दिसत आहे. स्थानिक कामगारांना तेथे स्थान नाही. या प्रकारची अवघड कामे स्थानिकांना जमणार नाहीत ती परप्रांतीयांकडून करून घेतली जातात असे सांगण्यात येते. रोजगाराच्या निमित्ताने छत्तीसगड, झारखंड, केरळ, राजस्थान, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक अशा भागांतून तरुणांसह कुटुंबीयांचा भरणा वाढत आहे तर ग्रामीणभागातील स्थानिक तरुणांसह कुटुंबीय मुंबई, पुणे, गोवा, सुरत अशा भागांत नोकरी व कामधंद्यासाठी स्थलांतरित होत आहेत. शेती व दूध व्यवसायाशी निगडीत असलेल्या मोठ्या गायींच्या गोठ्यांवरही याच परप्रांतियांनी कब्जा केला आहे. दरम्यान, या परिसरात सध्या चोरी प्रमाण वाढले असून या चोरींमागे हेच परप्रांतिय असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
ग्रामपंचायतींवर येतोय अतिरिक्त ताण
नीरा-बारामती रस्त्यालगत असल्याने वडगाव निंबाळकर या गावामध्ये ठिकठिकाणी या कामगारांचे थांबे असून यामध्ये युवक-युवती, लग्न झालेली तरुण जोडपी मुलाबाळांसह कामावर जाण्यासाठी नियोजन करीत मजुर अड्ड्यावर थांबलेली असतात. तर परप्रांतीयांच्या टोळीतील लोकसंख्या पाहिल्यानंतर या गावामध्ये एक वेगळा प्रभाग तयार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, मुलभूत गरजा निवारा, वीज व पाणी याचा अतिरिक्त ताण ग्रामपंचायतींवर पडत आहे.
स्थानिकांनी उपस्थितीत केलेले प्रश्न
सोमेश्वर परिसरात दुचाकी-चारचाकी वाहनांचेप्रमाण वाढले आहे. हे परप्रांतीय ट्रिप्पल, चौबल सीट बसुन दुचाकींवरुन प्रवास करत आहेत. त्यात ज्या दुचाकी “आऊटडेटेड’ झालेल्या आहेत त्या त्यांच्याकडे असून त्या आल्या कोठून? त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का? वाहनांची सर्व कागदपत्रे आहेत का ? त्यांच्याकडे आधारकार्ड, रहिवासी कागदपत्र आहेत का? त्यांच्यावरती त्यांच्या राज्यात कोणते गुन्हे दाखल आहेत का? या सर्व गोष्टींची पडताळणी स्थानिक पोलीस ठाण्याने व आरटीओ केली आहे का? या सारखे असंख्य सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले आहेत.
मागील काही महिन्यांपूर्वी भाडेकरूंची माहिती दिली नव्हती या कारणामुळे अनेक घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. तरी नवीन भाडेकरुंबद्दलची माहितीही घरमालकांनी लवकरात लवकर सादर करावीत, अन्यथा तीव्र कारवाईचा बडगा उगारला जाईल
– सोमनाथ लांडे, सहायक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर