नवी दिल्ली – मणिपूरमध्ये काही महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर आणखी एका नव्या संकटाची चाहूल लागली आहे. मणिपूरमध्ये दि. 22 आणि 23 जुलै रोजी म्यानमारच्या सुमारे 718 नागरिकांनी अवैधरित्या घुसखोरी केली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
गृहविभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन दिवसांमध्ये 301 बालकांसह 718 म्यानमारच्या नागरिकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय प्रवेश केला आहे. यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारने आसाम रायफल्सकडे मागितला आहे. आसाम रायफल्स हे सीमेवर सुरक्षेची जबाबदारी पार पडत असतात. त्यामुळे मणिपूर सरकारने आसाम रायफल्सकडे उत्तर मागितले आहे. दरम्यान, ज्या म्यानमारच्या नागरिकांनी भारतात प्रवेश केला आहे त्यांच्याजवळ दारूगोळा आणि हत्यारं तर नाही ना ही चिंता राज्य सरकारला लागून राहिली आहे.
आसाम रायफल्सच्या सेक्टर 28 कडून 718 म्यानमार नागरिकांनी सीमा ओलांडून चंदेल मार्गे मणिपूरमध्ये प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली. 718 नवीन निर्वासितांनी भारत-म्यानमार सीमा ओलांडत न्यू लजांगच्या सामान्य भागात प्रवेश केला आहे. यात 209 पुरुष, 208 महिला आणि 301 मुलांचा समावेश आहे.
यावर मणिपूर सरकारचे म्हणणे आहे की, या प्रकरणी आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला असून यासोबतच म्यानमारच्या या नागरिकांना परत पाठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मणिपूरमध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या हिंसाचाराच्या काळात म्यानमारमधील या घुसखोरीमुळे सरकारची चिंता वाढली आहे.