जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसाचा बसला फटका
शिंदे वासुली- जुलै महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतांची तळी झाली होती. काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे शेतातील माती वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेली बटाट्याची पिके पोषणा अभावी पिवळी पडली आहेत. पिकांवर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी भरघोस उत्पन्न देणारे बटाटा पीक हातचे जाणार म्हणून शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.
चाकणच्या पश्चिमेला असणाऱ्या शिंदे, वासुली, भांबोली, शेलू, आसखेड, वराळे, कोरेगाव, आंबेठाण आदि गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले होते; मात्र या पावसाचा तडाखा बटाटा व भुईमूगा सारख्या पिकांना चांगलाच बसला आहे. पावसाळ्यात येथील शेतकरी आपल्या शेतात प्रामुख्याने बटाटा व भुईमुगाचे मुख्य पीक घेतात. यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. या दोन्ही पिकांना आवश्यक असलेले पोषक वातावरणामुळे चांगले उत्पादन होते.
बारा ते तेरा आठवड्यात दोन्ही पिके काढणीला येतात. काही दिवसांच्या मेहनतीने शेतकऱ्यांच्या हातात पैसा येतो म्हणून या दोन्ही नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो; परंतु यंदा अनपेक्षित झालेल्या पावसाने बटाटा पीक धोक्यात आले आहे. शेतकरी शेतात मातीच्या सरी पाडून उंच भागात बटाट्याची लागवड करतात. परंतु पावसामुळे बटाट्याच्या रोपांखालील माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली पीक अशक्त होऊन पोसलेच नाही, अशी परिस्थिती सगळ्याच गावात आहे. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
भांबोली येथील संपत चिंधू राऊत या शेतकऱ्याने भरघोस उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने पाच एकर शेतीत बटाटा पिकाची लागवड केली आहे; परंतु पावसाने रोपे पिवळी पडली आहेत. शेतात पाणी साचल्याने सगळे पीक उपळले तर भरघोस आलेले पीक विरळ झाले आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होऊन सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान होणार असल्याचे संपत राऊत यांनी सांगितले.