फैलाव रोखण्यात पालिका प्रशासनाला अपयश; विरोधी पक्षांची टीका
पुणे – “झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण सापडल्यानंतर गांभीर्य ओळखून करोनाला आळा घालण्यासाठी पावले उचला, असे निदर्शनास आणूनही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दुर्लक्ष केले. या साथीचे नियोजन करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले,’ अशी टीका महापालिकेतील विरोधीपक्षांनी केली आहे. तसेच “याला प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त जबाबदार असून त्यांना पुन्हा राज्य शासनाच्या सेवेत बोलावून घ्यावे,’ अशी मागणीही नेत्यांनी रविवारी केली.
विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, “शहरातील झोपडपट्ट्या आणि मध्यवस्तीमध्ये करोनाबाधित आढळले. यावेळीही झोपडपट्ट्या सील करून घरपोच धान्य पोचवा, अशी सूचना केली होती. तसा ठरावही मंजूर केला. त्याचीही अंमलबजावणी केलेली नाही. करोनाची साथ रोखायची असल्यास प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे.’
पृथ्वीराज सुतार म्हणाले, “करोनाबाबतच्या सूचना व अडचणी प्रशासन गांभीर्याने घेत नाही. प्रशासनामध्ये समन्वय नसल्याने अनेक त्रुटी दिसून येत आहे. दाट वस्त्यांमध्ये चाचण्या करण्यासाठी बराच कालावधी लागला. या वस्त्यांमध्ये सुरक्षा साधने पुरवलेली नाहीत. विलगीकरण कक्षातही सर्व रुग्ण एकत्रित ठेवण्यात येत आहेत.’
करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना घरोघरी सर्व्हेक्षणाचे काम सोपवले होते. उन्हात फिरणाऱ्या या शिक्षकांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवली नाही. हे सर्व्हेक्षण केलेल्या फॉर्म्सचे गठ्ठे बांधून पडले आहेत. या तपासणीच्या अहवालाचा काय उपयोग झाला, हे प्रशासनाने स्पष्ट करावे.
– दीपाली धुमाळ, विरोधी पक्ष नेत्या, मनपा