वाल्हे: वाल्हे (ता.पुरंदर) येथील मुकदमवाडी येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
आज आढळलेला कोरोनाबाधित तरुण चौदा दिवसांपूर्वी कुर्ला (मुंबई येथून) आपल्या मूळगावी आला होता. आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांना त्रास जाणवू लागल्याने सासवड येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
यावेळी खासगी रुग्णालयामार्फत त्यांची खासगी लॅबमध्ये कोरोना विषाणूची तपासणी केली. त्याचा तपासणी अहवाल आज पॉझिटीव्ह आला असल्याचे पुरंदर तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले.
दरम्यान, वाल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्याने वाल्हे सह कामठवाडी, माळवाडी, दातेवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने वाडीमध्ये जाऊन कोरोना नियंत्रण समिती व ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे त्यांच्या घशातील द्राव काढुन प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
या तरुणाला कोरोनाचा संसर्ग नेमका कोठे आणि कसा झाला, याचा तपास आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. याबाबत सरपंच अमोल खवले यांनी सांगितले की, मुदकमवाडी येथील रुग्णाचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर गावात सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मुकदमवाडी येथे औषध फवारणी करून निर्जुंतिकीकरण करण्यात येणार आहे. रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने सुरू केले आहे.
वाल्हे गाव व वाड्यावस्त्यांवरील नागरिकांनी मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगचा वापर करताना जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी केले आहे.
आठवडी बाजार बंद
वाल्हे येथील आज मंगळवारचा आठवडी बाजार भरला होता. मात्र गावात पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाल्हे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल खवले, वाल्हे पोलिस कर्मचारी बी. व्ही.जगदाळे, समीर हिरगुडे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदींनी वाल्हे येथील आठवडे बाजार बंद करण्याची विनंती शेतकरी व व्यापारीवर्गाला केली.
वाल्हे येथील बाजारपेठेतील व्यापारीवर्गाने उद्या बुधवार (दि.०८) रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गुरूवार पासून सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून दुपारी १ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता बाकीची सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती सरपंच अमोल खवले यांनी दिली.