लखनौ : भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारी मिताली ही पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघात एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीने शुक्रवारी हा विक्रम आपल्या नावे केला.
मिताली राजच्या दहा हजार धावा पूर्ण करणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाला मात्र, पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना अत्यंत अटीतटीचा सुरू असतानाच पावसाचा व्यत्यय आला. पाऊस थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने पंचांनी डकवर्थ-लुइस नियमाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेला 6 धावांनी विजयी घोषित केले.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 248 धावा केल्या होत्या. विजयासाठी 249 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या लायझील ली हीच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर विजयाची चाहूल लागली होती. मात्र, 21चेंडूत 26 धावांची गरज असताना पाऊस सुरु झाला व नंतर सामना सुरू होऊ शकला नाही. पाच एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत आता दक्षिण आफ्रिका संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.