अहमदाबाद – भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शुक्रवारी झालेला तिसरा व अखेरचा सामनाही जिंकत 3-0 अशी मालिकाही जिंकली. पाहुण्या वेस्ट इंडीजला व्हाइटवॉश देताना रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाच्या पहिल्याच मालिकेत विजयाची नोंद केली.
– रोहितच्या नेतृत्वात पहिलाच मालिका विजय
– कर्णधार असताना भारताने सलग 11 सामने जिंकले
– कोहलीच्या 10 सामन्यांतील विजयाला टाकले मागे
भारताने विजयासाठी दिलेल्या 266 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा डाव अवघ्या 38 व्या षटकांत 169 धावांवर संपला. त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी साफ निराशा केली तसेच मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर यांनी मोक्याच्या क्षणी गडी बाद केल्याने वेस्ट इंडीजची अवस्था 7 बाद 82 अशी बिकट बनली होती. ओडेन स्मिथ, निकोलस पूरन, अल्झारी जोसेफ यांनी थोडीफार चमक दाखवली. मात्र, मोठी खेळी करण्यात त्यांच्यापैकी एकालाही यश आले नाही.
स्मिथने 18 चेंडूत 3 चौकार व 3 षटकार यांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. पूरनने 34 धावांच्या खेळीत 39 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 1 षटकार फटकावला. जोसेफनेही आक्रमक फलंदाजी करत 29 धावा केल्या. मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा व महंमद सिराज यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. दीपक चहर व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्माने शिखर धवनसह केली. रोहितने सुरुवात थाटात केली. मात्र, 13 धावांवर तो तंबूत परतला. संघात परतलेल्या धवनला सूरच गवसला नाही. तो 10 धावा काढून परतला. यावेळी माजी कर्णधार विराट कोहलीनेही निराशा केली. त्याला खातेही उघडता आले नाही. या मालिकेत दुसऱ्यांदा अल्झारी जोसेफने त्याला बाद केले. भारताचे तीन खंदे फलंदाज बाद झाले तेव्हा 3 बाद 42 अशी बिकट स्थिती बनली होती. या सामन्यात संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरने ऋषभ पंतला साथीला घेत संघाचा डाव सावरला. या जोडीने शतकी भागीदारी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली.
पंत अर्धशतक फटकावल्यावर लगेचच परतला. त्याने आपल्या 56 धावांच्या खेळीत 54 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावला. अय्यर भरात होता. मात्र, शतक साकार करणार असे वाटत असतानाच अय्यर 80 धावांवर अनावश्यक फटका मारून बाद झाला. त्याने 111 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनेही निराशा केली. त्याच्या जागी आलेल्या दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 38 धावांची भागीदारी केली.
चहर उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावा करून बाद झाला. सुंदरने 34 चेंडूत 33 धावा करताना 2 चौकार आणि एका षटकार फटकावला. त्यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीमुळेच भारताला 50 षटकांत सर्वबाद 265 धावा उभारता आल्या. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डरने 4, तर अल्झारी जोसेफ आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक – भारत – 50 षटकांत सर्वबाद 265 धावा. (श्रेयस अय्यर 80, ऋषभ पंत 56, दीपक चहर 38, वॉशिंग्टन सुंदर 33, अवांतर 20, जेसन होल्डर 4-34, अल्झारी जोसेफ 2-54, हेडन वॉल्श 2-59). वेस्ट इंडीज – 37.1 षटकांत सर्वबाद 169 धावा. (ओडेन स्मिथ 36, निकोलस पूरन 34, अल्झारी जोसेफ 29, डॅरेन ब्राव्हो 19, ब्रेंडन किंग 14, हेडन वॉल्श 13, प्रसिद्ध कृष्णा 3-27, महंमद सिराज 3-29, दीपक चहर 2-39, कुलदीप यादव 2-51).