अहमदाबाद – भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल याने एकदिवसीय कारकिर्दीत शंभर बळी पूर्ण केले. त्याने पहिल्या एकदिवसीय लढतीत खेळताना 4 गडी बाद केले. वेस्ट इंडिजचा सलामीवीर निकोलस पूरनला बाद करत त्याने 60 व्या सामन्यात आपला शंभरावा बळी नोंदवला. सर्वात कमी सामन्यात ही कामगिरी करणारा चहल भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी महंमद शमीने 56 व्या सामन्यात केली होती.
दरम्यान, यजमान भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून मात केली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात एक हजार सामने खेळणारा पहिलाच संघ बनणाऱ्या भारतीय संघाने अविस्मरणिय विजयाची नोंद केली.
भारताच्या एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच सामना होता. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 28 षटकांत 4 गडी गमावून 178 धावा करत विजय प्राप्त केला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.