बेंगळुरू – श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजाने संघात पुनरागमन करताना दीमाखदार कामगिरी केली. त्याने पहिल्या कसोटीत दीडशतकी खेळी केली तसेच गोलंदाजीतही चमक दाखवताना दोन्ही कसोटीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा घेतला. मात्र, मालिकेचा मानकरी पुरस्कार त्याच्या ऐवजी ऋषभ पंतला देण्यात आला. आता यावरुन बीसीसीआयला ट्रोल करण्यात आले असून मालिकेचा मानकरी ठरवताना कोणते निकष लावले असा सवालही चाहत्यांनी सोशल मीडियावर केला आहे.
भारतीय संघाने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 238 धावांनी पराभव केला. भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेचा टी-20 पाठोपाठ कसोटी मालिकेतही पराभव केला. कसोटी मालिकेतील चमकदार कामगिरीसाठी पंतला मालिकावीर तर, श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार
देण्यात आला.
पंतने कसोटी मालिकेत दोन अर्धशतकांसह 185 धावा केल्या आणि यष्टीमागे 8 बळी घेतले. त्याच्या या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. कसोटी मालिकेत असा पुरस्कार मिळवणारा तो भारताचा पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे. मात्र, पंतची कामगिरी जडेजापेक्षा सरस कशी ठरते, असा प्रश्न आता बीसीसीआयला विचारला जात आहे.
या उलट जडेजाने पहिल्या कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यात त्याने 175 धावांची खेळी केली तसेच 9 गडीही बाद केले. दुसऱ्या कसोटीत त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. जडेजाने दोन डावांत अनुक्रमे 4 आणि 22 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात जडेजाने एकच बळी घेतला. मात्र, या दोन कसोटींच्या मालिकेत त्याने 201 धावा आणि 10 गडी बाद केले आहेत.
पंतने पहिल्या कसोटीत 96 तर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 39 आणि नंतर दुसऱ्या डावात 31 चेंडूत 50 धावा केल्या. या मालिकेत त्याने यष्टीमागे 10 गडी बाद केले. ही आकडेवारी पाहता जडेजावर अन्याय झाल्याचे मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे.