इंदूर : फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करत भारताने श्रीलंकेविरूध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
That's that from Indore.#TeamIndia win by 7 wickets. Lead the three-match series 1-0.#INDvSL pic.twitter.com/5mtCxcHFHr
— BCCI (@BCCI) January 7, 2020
विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य भारताने १७.३ षटकांत ३ बाद १४४ धावा करत पूर्ण केले. भारताची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ९.१ षटकात ७१ धावा जोडल्या. राहुलने ३२ चेंडूत ६ चौकारासह ४५ धावा केल्या. त्यानंतर ११.२ षटकांत संघाची धावसंख्या ८६ असताना धवन बाद झाला. धवनने २९ चेंडूत २ चौकारासह ३२ धावा केल्या.
त्यानंतर विराट आणि श्रेयस अय्यरने संघाची धुरा हाती घेत तिस-या विकेटसाठी ५१ धावांची भागिदारी करत भारताला विजयासमीप नेल. विजयासाठी ६ धावांची आवश्यकता असताना श्रेयस बाद झाला. श्रेय्यसने २६ चेंडूत ३ चौकार व १ षटकारासह ३४ धावा केल्या. श्रीलंकेकडून वाणिदु हसरंगाने २ तर कुमाराने १ गडी बाद केला. त्यानंतर १७ षटकातील तिस-या चेंडूवर कुमाराला कोहलीने षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोहलीने १७ चेंडूत १ चौकार व २ षटकारासह ३० धावा केल्या तर रिषभ पंत १ धावेवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारताना श्रीलंकेस प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडोने २०, दनुष्का गुणातालिकाने २२ आणि ओशदा फर्नांडोने ३४ धावांची खेळी करत श्रीलंकेला चांगली सुरूवात करून दिली. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने ११.३ षटकांत ३ बाद ८२ अशी मजल मारली होती. मात्र त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज ठराविक धावांच्या अंतरावर बाद होत गेले आणि २० षटकांत श्रीलंकेला १४२ पर्यंत मजल मारली. वाणिदु हसरंगाने १० चेंडूत नाबाद १६ धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांनी आज प्रभावी गोलंदाजी केली. शार्दुल ठाकूरने ४ षटकांत २३ धावा देत ३ गडी बाद केले. त्याने १८ व्या षटकांत ५ व्या,६ व्या चेंडूवर इसरू उदाना आणि लसित मलिंगा यांना अनुक्रमे लागोपाठ बाद केले. तर नवदीप सैनीने ४ षटकात १८ धावा देत तर कुलदीप यादवने ४ षटकात ३८ धावा देत प्रत्येकी २ गडी बाद केले. तर वाॅशिंगटन सुंदर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १ गडी बाद केला.