धर्मशाला – कर्णधार दासुन शनाका व चामिका करुणारत्ने यांनी केलेल्या भक्कम भागीदारीमुळे श्रीलंकेचा डाव सावरला. या जोडीने जबाबदारीने फलंदाजी करत भारतीय संघाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 5 गडी गमावून 146 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला हा निर्णय चुकीचा ठरवला. एकवेळ श्रीलंकेची स्थिती 5 बाद 60 अशी बिकट बनली होती. दीनेश चंदीमलने 25 धावांची खेळी केली मात्र, तो मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. त्यावेळी कर्णधार शनाकाने एकहाती जबाबदारी घेतली. त्याने करुणारत्नेच्या साथीत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली.
शनाकाने 38 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 74 धावांची खेळी केली. करुणारत्नेने त्याला सुरेख साथ देत 19 चेंडूत संयमी 12 धावा केल्या. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 47 चेंडूत 86 धावांची भक्कम भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला सुरेख गोलंदाजी केली मात्र, अखेरच्या पाच षटकांत त्यांना दिशा व टप्पा योग्य राखता आला नाही व त्याचा लाभ शनाकाने पुरेपुर घेतला.
अखेरच्या या पाच षटकांत श्रीलंकेने तब्बल 69 धावा काढल्या. श्रीलंकेच्या पहिल्या चार फलंदाजांना दोनअंकी धावाही करता आल्या नाहीत. भारताकडून आवेश खानने 2 गडी बाद केले. महंमद सिराज, हर्षल पटेल व रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – श्रीलंका – 20 षटकांत 5 बाद 146 धावा. (दीनेश चंडीमल 25, दासुन शनाका नाबाद 74, चामिका करुणारत्ने नाबाद 12, आवेश खान 2-23, महंमद सिराज 1-22, हर्षल पटेल 1-29, रवी बिष्णोई 1-32).