मोहाली – रविंद्र जडेजाची अष्टपैलू खेळी व त्याला रवीचंद्रन अश्विनने दिलेली तोलामोलाची साथ यांच्या जोरावर यजमान भारतीय संघाने श्रीलंकेचा पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी रविवारी एक डाव आणि 222 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी भक्कम आघाडी घेतली. या सामन्यात दीडशतकी खेळी व दोन्ही डावांत मिळून 9 गडी बाद करणारा जडेजा सामन्याचा मानकरी ठरला.
दरम्यान, भारतीय संघाचे फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी जोडी तूझी माझी पुन्हा एकदा हीट ठरवताना विक्रमांना गवसणी घातली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विनने भारताचे महान वेगवान गोलंदाज व माजी कर्णधार कपील देव यांच्या 434 बळींना मागे टाकताना 435 बळींची नोंद केली. कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत आता अश्विन दुसऱ्या क्रमांकावर दाखल झाला आहे. पहिल्या स्थानी 619 बळींसह अनील कुंबळे कायम आहे. अश्विनने श्रीलंकेच्या चरिथा असालंकाला आपल्याच गोलंदाजीवर विराट कोहलीकरवी झेलबाद करत ही कामगिरी केली.
जडेजाचे अष्टपैलुत्व
भारताचा अष्टपैलु रवींद्र जडेजाने दुखापतीतून सावरत या कसोटीत भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करताना एका विक्रमाची नोंद केली. एकाच कसोटीच्या एका डावात दीडशतकी खेळी व पाच गडी बाद करत त्याने अशी कामगिरी करणारा भारताचा तीसरा अष्टपैलु बनण्याचा मान मिळवला.
यापूर्वी अशी कामगिरी विनु मांकड यांनी 1952 साली इंग्लंडविरुद्ध केली होती. त्यानंतर भारताच्याच पॉली उम्रीगर यांनी 1973 साली वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद 172 धावांची खेळी केल्यावर गोलंदाजीत 5 गडीही बाद केले होते. त्यानंतर तब्बल 50 वर्षांनी जडेजाने ही कामगिरी केली.