मुंबई – भारतीय संघाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा संघातील इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना अखेरची संधी असेल असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. गेल्या दीड वर्षांत या तिनही खेळाडूंनी सुमार कामगिरी केली असून त्यांना जर आपली कसोटी कारकीर्द वाचवायची असेल तर त्यांना चमकदार कामगिरी करावी लागणार आहे, असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले आहे.
करोनाचा धोका निर्माण होण्यापूर्वी तसेच लॉकडाऊनच्या कालावधीनंतर जागतिक क्रिकेटमध्ये सुरू झालेल्या विविध मालिकांमध्ये भारतीय संघाने वर्चस्व राखले आहे. मात्र, एखाद दोन सामन्यांचा अपवाद वगळता या तिनही खेळाडूंकडून चमकदार कामगिरी झालेली नाही.
इशांतची गोलंदाजी सातत्याने अपयशी ठरली असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत इशांत साफ अपयशी ठरला होता. तसेच संघाचे उपकर्णधारपद असूनही रहाणेला कामगिरीत चमकही दाखवता आली नाही.
जे अपयश रहाणेला आले तेच चित्र पुजाराच्या बाबतीतही दिसून आले. भारतीय संघाकडे मुख्य खेळाडूंसाठी भक्कम सेकंड बेंच असल्याने या तिनही खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ही अखेरची संधीच असेल, असेही स्पष्ट संकेत बीसीसीआयने दिले आहेत.