मुंबई – भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार विराट कोहली मुंबईतील सीसीआय व वानखेडे मैदानावर कसून सराव करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून विश्रांती घेतलेला कोहली माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या उपस्थितीत फलंदाजीचा सराव करत आहे.
सकाळ व दुपार अशा दोन सत्रात हा सराव सुरु असून न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी कोहली भारतीय संघात परतणार आहे. पहिला कसोटी सामना कानपूरला सुरु असून संघासह सराव करण्यासाठी कोहलीने कानपूरला जाण्यापेक्षा मुंबईतच सराव करण्यावर भर दिला आहे. सीसीआय व वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीत फारसा फरक नसल्याने त्याने सामन्याचा सरा व्हावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.
सध्या हिवाळा सुरु असल्याने सकाळी खेळपट्टीवर दव पडलेले असते तसेच वातावरणही थंड असते त्यामुळे वेगवान गोलंदाजांना स्विंगची मदत मिळते. हेच लक्षात गेत कोहली सकाळी स्थानिक वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर तसेच गोलंदाजीच्या मशिनसह सराव करत आहे. दुपारच्या सत्रात खेळपट्टी कोरडी होत असल्याने फिरकी गोलंदाजीवर त्याचा सराव होतो.
दोन वर्षांचे अपयश
विराट कोहली गेल्या दोन वर्षांपासून चमकदार कामगिरीसाठी झगडत आहे. या कालावधीत त्याच्याकडून एकही शतकी खेळी झालेली नाही. 2019 सालच्या नोव्हेंबरमध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध कसोटी शतक फटकावले होते. 2021 सालच्या मोसमात त्याने एकूण 9 कसोटी सामने खेळले असून त्यात कोहलीने 15 डावांमध्ये 44.61 च्या सरासरीने 447 धावा केल्या आहेत. यात 72 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.