मुंबई : टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा संपल्यावर न्यूझीलंडचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या मालिकेतील टी-20 सामन्यांच्या स्पर्धेतून विराट कोहली व रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात येणार आहे. भारतीय संघ यंदाच्या मोसमात सातत्याने सामने खेळत आहे, त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत नवोदितांना जास्तीत जास्त संधी देण्याचे निवड समितीने ठरवले आहे.
याच खेळाडूंमधून 2022 साली ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी सेकंड बेंच निर्माण व्हावा हाच या निर्णयामागील हेतू असल्याचेही बीसीसीआयने सांगितले आहे. यंदाच्या तसेच पुढील मोसमात भारतीय संघ मायदेशात चार देशांविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्याची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून होणार आहे. टी-20 विश्वकरंडकाचा अंतिम सामना पार पडल्यानंतर 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड संघाच्या दौऱ्याची सुरुवात होईल. या दौऱ्यात 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसह 2 कसोटी सामनेही खेळवले जाणार आहेत. हे कसोटी सामने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग असतील, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना, 17 नोव्हेंबर (जयपूर)
दुसरा टी-20 सामना, 19 नोव्हेंबर (रांची)
तिसरा टी-20 सामना, 21 नोव्हेंबर (कोलकाता)
पहिली कसोटी, 25 ते 29 नोव्हेंबर (कानपूर)
दुसरी कसोटी, 3 ते 7 डिसेंबर (मुंबई)
सध्याच्या भारतीय संघातील जवळपास सर्व खेळाडू सातत्याने बायोबबलमध्ये राहात आहेत. नवोदितांना संधी देताना या वरिष्ठ खेळाडूंनाही आपल्या कुटुंबीयांसह वेळ घालवता येणार असून, त्यांना बायोबबलमधून बाहेर पडण्याचीही संधी मिळेल तसेच त्यानंतरच्या आगामी मालिकांसाठी ते ताजेतवाने होतील, असेही बीसीसीआयने सूचित केले आहे.
कोहली व रोहितसह जसप्रीत बुमराह, महंमद शमी यांना विश्रांती देतानाच नवोदित ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर या युवा खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.
चहरच्या निवडीचे कोहलीकडून समर्थन
आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहल याच्या जागी राहुल चहरचा भारतीय संघात समावेश केल्याच्या निर्णयाचे कर्णधार विराट कोहलीने समर्थन केले आहे. आखातातील खेळपट्टीवर चहलपेक्षा चहर जास्त उपयुक्त ठरू शकतो, असे सांगत कोहलीने निवड समितीच्या निर्णयाबाबत आयसीसीच्या कॅप्टन कॉलमधील संवादात समाधान व्यक्त केले. रविचंद्रन अश्विनच्या संघनिवडीवरही कोहलीने हा योग्य निर्णय असल्याचे सांगितले.