मुंबई – सलामीवीर मयंक आग्रवाल याच्या तडाखेबंद नाबाद शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्धच्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ थंबला तेव्हा भारताने आपल्या पहिल्या डावात 4 बाद 221 धावा केल्या. दोन दिवस झालेल्या पावसामुळे मैदान निसरडे असल्यामुळे खेळ उशिरा सुरू झाला. या सामन्यात पहिल्या दिवसाच्या कोट्यातील 20 षटकांचा खेळ वाया गेला.
नियमित कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल अशा वातावरणातही भारतीय फलंदाजांनी थाटात सुरुवात केली. सलामीवीर मयंकने शुभमन गिलच्या साथीत संघाला 80 धावांची सलामी दिली.
गिल सुरेख खेळत असतानाच भारतीय वंशाच्या व मुंबईतच जन्मलेल्या एजाज पटेलने गिलला बाद केले. त्याने 44 धावा केल्या. त्यानंतर पटेलने चेतेश्वर पुजारा व कोहली यांना खातेही उघडू न देता तंबूचा रस्ता दाखवला. मात्र, पहिल्या कसोटीतील तारणहार श्रेयस अय्यरने मयंकला साथ देत संघाचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी केली व संघाला दीडशतकी मजल मारून दिली.
कोहलीबाबत निर्णय चुकला …
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली याच्या बाद होण्यावरून चांगलीच चर्चा रंगली. भारताची फलंदाजी सुरू असताना पहिल्या डावातील एजाज पटेलने टाकलेल्या 30 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कोहलीला पायचित बाद देण्यात आले. मैदानावरील पंचाने कोहलीला बाद ठरवल्यावर कोहलीने डीआरएस घेतला. त्यात चेंडू कोहलीच्या पॅडला लागण्यापूर्वी त्याचा स्पर्श बॅटला झाला होता हे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत असूनही तिसऱ्या पंचाने मैदानावरील पंचाचाच निर्णय कायम राखत कोहलीला बाद ठरवले.
दरम्यान, मयंकने अर्धशतक साकार केले. स्थिरावलेला अय्यर 18 धावांवर बाद झाल्यावर यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने मयंकला साथ देत न्यूझीलंडला आणखी यश मिळू दिले नाही. मयंकने न्यूझीलंडच्या संमिश्र गोलंदाजीचा अफलातून सामना करताना शतक पूर्ण केले. त्याने साहाच्या साथीत पाचव्या गड्यासाठी 61 धावांची अखंडित भागीदारी करत संघाचे द्विशतक फलकावर लावले.
रहाणे, इशांत व जडेजाला वगळले
न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना वानखेडे मैदानावर आजपासून सुरू झाला. या सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली संघात परतला. मात्र, त्याचवेळी संघात काही मोठे बदल झाले. या सामन्यासाठी अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांना वगळण्यात आले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसननेही दुखापतीने माघार घेतली असून, टॉम लॅथमकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कानपूर येथील ग्रीन पार्क येथे खेळवण्यात आलेला या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने खेळपट्टी ओली आहे. त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. इशांत, जडेजा आणि रहाणे या तिघांनाही दुखापत झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
खेळ थांबला तेव्हा मयंक 120, तर साहा 25 धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडकडून एजाज पटेलनेच भारताचे चारही फलंदाज बाद केले. या कसोटीसाठी भारतीय संघाने दुखापतीच्या कारणाने इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे व रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननेही दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घेतली. त्याच्या जागी टॉम लॅथमकडे नेतृत्व सोपवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 70 षटकांत 4 बाद 221 धावा. (शुभमन गिल 44, श्रेयस अय्यर 18, मयंक आग्रवाल खेळत आहे 120, वृद्धिमान साहा खेळत आहे 25, एजाज पटेल 4-73).