-अमित डोंगरे
भारत व इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. क्रिकेटच्या या अत्यंत वेगवान प्रकारात ज्या संघाकडे जास्त अष्टपैलू असतात त्या संघाला विजयाची संधी जास्त असते. अर्थात, काही गोलंदाज व फलंदाजही एकहाती असे सामने फिरवू शकतात पण प्रत्येक संघाची गरज अष्टपैलू खेळाडूंचीच असते. याही मालिकेत दोन्ही संघातील अष्टपैलू खेळाडूच निर्णायक ठरतील.
कसोटी मालिका जिंकल्यावर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावल्याचे जरी सांगितले जात असले तरीही गेल्या जवळपास चार मोसमात इंग्लंडचा टी-20 संघ जास्त प्रगती करताना दिसला असून त्यांनी क्रिकेटच्या या प्रकारात जागतिक क्रिकेटमधील बलाढ्य संघांवरही सातत्याने दडपण ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे ही मालिका भारताला जिंकायची असेल तर संघातील अष्टपैलू खेळाडूंना आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त चमकदार खेळ करावा लागेल.
दोन्ही संघांचे बलाबल पाहिले तर भारताकडे हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर व अक्सर पटेल असे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यातही पंड्या व पटेल यांच्याकडून जास्त अपेक्षा राहणार आहेत. पटेलने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कसोटी मालिकेत इंग्लंडच्या भल्या भल्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. तसेच त्याने संघाला जेव्हा गरज होती तेव्हा धावाही केल्या आहेत. त्यामुळे या मालिकेतही त्याची मिस्ट्री गोलंदाजी इंग्लंडला भारी पडू शकते. तसेच पंड्याबाबत काय बोलावे असा प्रश्न पडतो. हे विधान जरा धाडसी होईल पण कपिलदेव निवृत्त झाल्यानंतर इतक्या वर्षांत भारतीय संघाला गवसलेला हा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे.
दुखापतीतून नुकताच सावरलेला असल्यामुळे त्याला जास्त षटके गोलंदाजी करता येणार नव्हती त्यामुळे कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली नाही पण मर्यादित षटकांच्या संघात पंड्याची निवड निश्चित असते. निवड समितीदेखील संघात निवड केलेल्या खेळाडूंची नावे लिहिताना कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यापाठोपाठ पंड्याचे नाव लिहीत असेल.
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सही या मालिकेत धोकादायक ठरू शकतो. इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या सामन्याचा कर्णधार इयान मॉर्गन याची फलंदाजी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. काही वर्षांपूर्वी अशाच एका टी-20 सामन्याचे समालोचन करताना विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी एक विधान केले होते की ज्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा जास्त असतो त्याच संघाला असे वेगवान सामने जिंकण्याची संधी जास्त असते. सुरुवातीला भारतीय संघाने क्रिकेटच्या या प्रकारावर नाक मुरडले होते मात्र, 2007 साली झालेली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा भारताने जिंकली व त्याचवेळी टी-20 क्रिकेटने भारतातही पाळेमुळे रोवली. विश्वकरंडक स्पर्धेने पाया घातला तर आयपीएलने त्यावर कळस चढवला.
असो, पुढील काळात भारतीय संघाला टी-20 सामनेच जास्त खेळायचे आहेत. या मालिकेद्वारे पुढील मोसमातील स्पर्धांची रंगीत तालीम करण्याची नामी संधी भारतीय संघाला आहे. या मालिकेतून भारताच्या सेकंड बेंचची गुणवत्ताही तपासली जाणार असून त्यानंतरच टी-20 चे स्पेशालिस्ट उदयाला येतील अशी अपेक्षा आहे.