अहमदाबाद – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अहमदाबादच्या खेळपट्टीचे समर्थन केले आहे. भारतीय संघाने इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आणि दोन दिवसांपूर्वी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या कोहलीने आता खेळपट्टीचे गुणगान केले आहे. सामना जिंकला असल्याने त्याच्या तोंडून खेळपट्टीबाबत एकही विरोधी मत व्यक्त झालेले नाही.
ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत होती. मात्र, त्यावर फलंदाजी करणे कठीण नव्हते. जे फलंदाज बाद झाले ते चेंडूच्या फिरकीमुळे नव्हे तर सरळ चेंडूवर अनावश्यकपणे फलंदाजी केल्यामुळे बाद झाले, असे वक्तव्य कोहलीने केले आहे.
आमची फलंदाजी पहिल्या डावात चांगली झाली नाही. फलंदाजांनी खेळपट्टीवर जास्त काळ थांबणे गरजेचे होते. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजीची भेदकता इतकी अशक्य नव्हती पण तरीही फलंदाजांनी हाराकिरी केली. इंग्लंडच्या फलंदाजांनीही अक्सर पटेल व रवीचंद्रन अश्विन यांच्या गोलंदाजीवर जसे फटके खेळले ते पाहता दोन्ही संघांच्या फलंदाजांनी या सामन्याचे गांभीर्य ओळखले नाही, असे मतही कोहलीने व्यक्त केले.
दोन्ही संघातील फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. पहिल्या डावांत आम्ही 3 गडी गमावून 98 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर केवळ 47 धावांत पुढील सात फलंदाज आम्ही गमावले. संघ 145 धावांत बाद झाला. आम्ही आणखी चांगली फलंदाजी करु शकलो असतो. खेळपट्टीत कोणताही दोष नव्हता, असे सांगत कोहलीने या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचे समर्थन केले.
ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती. चेंडू बॅटवर व्यवस्थित येत होता. पहिल्या डावांत खेळपट्टीवर चेंडूला स्विंगही मिळत होता. या सामन्यात पडलेल्या तीस बळींपैकी 21 बळी सरळ चेंडूवर पडले. म्हणजेच चेंडूला जास्त टर्न मिळत असला तरीही फलंदाजी कठीण नव्हती. कसोटीत बचावात्मक फलंदाजीवर मदार असते. फलंदाजांनी खेळपट्टीवर संयम दाखवायला हवा होता, असेही कोहली म्हणाला.