अहमदाबाद – कसोटी मालिका जिंकलेल्या भारतीय संघाची आजपासून इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका सुरू होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेद्वारे दोन्ही संघांना आगामी काळात भारतात होत असलेल्या विश्वकरंडक टी-20 स्पर्धेसाठी चांगला सराव करण्याची नामी संधी आहे.
अहमदाबादच्याच मैदानावर या मालिकेतील सर्व पाचही सामने होणार आहेत. भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सेकंड बेंचला खेळवण्यासाठी आग्रही आहेत. विजय हजारे स्पर्धेत सरस कामगिरी केलेला सलामीवीर शिखऱ धवन पूर्ण सज्ज झाला असला तरीही त्याला अंतिम 11 खेळाडूंच्या संघात संधी मिळेल का, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला मात्र, टी-20 क्रिकेटसाठी स्पेशालिस्ट मानला जात असलेला सलामीवीर लोकेश राहुल याचा समावेश होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे धवनला संघाबाहेरच राहावे लागणार आहे. भारताच्या डावाची सुरुवात हिटमॅऩ रोहित शर्मासह राहुल करेल. तिसऱ्या क्रमांकावर खुद्द कर्णधार कोहली फलंदाजी करेल. कसोटी मालिकेत देखील आक्रमक फलंदाजी केलेल्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला टी-20 मालिकेतही संधी मिळेल असे संकेत मिळाले असल्याने तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
त्याच बरोबर अष्टपैलू हार्दिक पंड्या याचाही समावेश निश्चित मानला जात असून तो सहाव्या क्रमांकावर भारतीय फलंदाजीला बळकटी देईल. फलंदाजांच्या यादीत केवळ चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करेल यावरच निर्णय होणे बाकी आहे. त्यासाठी सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर या मुंबईकर खेळाडूंमध्ये चुरस राहणार आहे.
गोलंदाजीबाबतही काहीसे असेच चित्र आहे. अर्थात भारतीय संघासाठी आनंददायी बातमी आहे ती म्हणजे स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त झाला असल्याने तोच संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याला साथ देण्यासाठी सेकंड बेंचमधील नवदीप सैनी याची निवड निश्चित मानली जात आहे.
त्याचबरोबर शार्दुल ठाकूर व दीपक चहर यांच्यापैकी एकाला संधी द्यायची झाली तर उपयुक्त फलंदाजी करण्याची क्षमता असल्याने ठाकूरचे पारडे जड समजले जात आहे. फिरकी गोलंदाजांत अक्सर पटेल संघात स्थान मिळवणार असेच बोलले जात आहे. त्याच्या जोडीला यजुवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यातही चहलचा अनुभव निर्णायक ठरणार आहे. मात्र, फलंदाजीचा निकष लावला तर सुंदरला नजरेआड करणे संघाला महाग पडू शकते.
कसोटी मालिका गमावली असली तरीही इंग्लंडचा टी-20 संघ जगात सर्वात बलाढ्य मानला जातो हेदेखील विसरून चालणार नाही. त्यांचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील संघाचा कर्णधार इयान मॉर्गन हेच त्यांचे बलस्थान आहे. त्याची आक्रमक फलंदाजी रोखण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर राहणार आहे. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम व टॉम कुरेन व बेन स्टोक्स अशी बलाढ्य नामावली त्यांच्या संघात आहे. त्यातही कुरेनबंधू व स्टोक्स कोणत्याही सामन्याचे चित्र पालटू शकतात त्यामुळे कसोटी मालिका जिंकली अशा आवेशात राहणे भारतीय संघासाठी नुकसानकारक ठरू शकते. त्यांची गोलंदाजीही अनुभवी आहे.
जोफ्रा आर्चर प्रमुख गोलंदाज असला तरीही त्यांची फिरकीही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. मोईन अली हाच त्यांचा सर्वात अचूक व भेदक फिरकी गोलंदाज असून भारतीय कर्णधार विराट कोहली व हिटमॅऩ रोहित शर्मा यांच्याविरुद्ध त्याची कामगिरी सातत्याने वरचढ ठरली आहे.
भुवनेश्वरच्या पुनरागमनाकडे लक्ष
भारताचा वेगवान व स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा जवळपास पंधरा महिन्यांनी संघात पुनरागमन करत आहे. त्याच्या तंदुरुस्तीकडे गेले कित्येक महिने भारतीय संघ लक्ष ठेवून होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका तसेच इंलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही तो उपलब्ध झालेला नव्हता त्यामुळे या टी-20 मालिकेत तो खेळणार असल्याने भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे तो या मालिकेत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागले आहे.