चेन्नई – चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पंच नितिन मेनन यांच्याशी वाद घातल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली संकटात आला आहे.
चेन्नई कसोटीत त्याने मैदानावरील पंच मेनन यांच्याशी एका निर्णयावरून वाद घातला होता. त्याची गंभीर दखल आयसीसीने घेतली असून दोन्ही बाजू ऐकल्यावर येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे तसेच कोहलीवर एका कसोटी सामन्याची बंदी लावली जाऊ शकते असेही संकेत देण्यात आले आहेत.
चेन्नई कसोटीत पंचांशी वाद घातल्यानंतर कोहलीवर अद्याप शिस्तभंगाची कारवाई देखील झालेली नाही. या सामन्यात अक्सर पटेलच्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटला पंच मेनन यांनी नाबाद ठरवले होते.
खरेतर रिप्लेमध्ये चेंडू यष्टीसमोर रूटच्या पायाला लागल्याचे स्पष्ट दिसत होते व तरीही पंच मेनन यांनी त्याला पायचित दिले नाही. भारतीय संघाने डीआरएस घेऊनही पंच मेनन यांचाच नाबाद असल्याचा निर्णय कायम राहिला व त्याचवेळी कोहलीने त्यांच्याशी वाद घातला.