चेन्नई – ब्रिस्बेन कसोटीतील नवोदितांनी केलेल्या अफलातून खेळाची पावती म्हणून आजपासून येथे सुरू होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघात याच नवोदितांना पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. तसेच केवळ नवोदितच नव्हे तर दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेल्या अनुभवी खेळाडूंसह संघाचा योग्य समतोल राखण्याकडे भारतीय संघव्यवस्थापनाचा कल राहणार आहे.
चेपॉकची ही खेळपट्टी क्रिकेटशी संबंध नसलेल्या व्यक्तीने जरी केली असली तरीही त्याकडे तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या तांत्रीक समितीने लक्ष दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परंपरेनूसार ही खेळपट्टी पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना तर नंतरचे तिनही दिवस फिरकी गोलंदाजांनाच मदत करेल अशी शक्यता बळावली आहे. भारतीय संघ ही चार कसोटी सामन्यांची मालिका मायदेशात खेळत असल्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांचेच पारडे जड राहणार असे सांगितले जात आसले तरीही इंग्लंडची वेगवान गोलंदाजी खेळणे त्यांच्यासाठीही आव्हान राहणार आहे.
जेम्स ऍण्डरसन व जोफ्रा आर्चर यांनी गेल्या तीन मोसमांपासून सातत्याने सरस कामगिरी केली आहे. त्यातच इंग्लंडच्या संघाने या दौऱ्यावर येण्यापूर्वी श्रीलंकेचा दौरा केला होता व त्यात निर्विवाद विजयही मिळवला होता. त्यामुळे त्यांनी आशियाई विशेषतः फिरकीला साथ करत असलेल्या खेळपट्टीवर खेळण्याचा चांगला सराव भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी केला आहे. त्यांचा कर्णधार व मधल्या फळीतील अव्वल फलंदाज ज्यो रूट याने अफलातून फलंदाजी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत केली असल्यानेभरात असलेल्या या जागतिक किर्तिच्या फलंदाजाला रोखण्याचे आव्हान भारताच्या गोलंदाजांवर आहे.
जसप्रीत बुमराह पूर्ण तंदुरुस्त ठरला असला तरीही त्याची ऑस्ट्रेलियातील संमिश्र कामगिरी पाहता यशाची खात्री कर्णधार विराट कोहलीही देणार नाही.
त्यातच ब्रिस्बेन कसोटीत नवोदित महंमद सिराजने जरी सरस कामगिरी केली असली तरीही इशांत शर्मा पूर्णफिट झाल्यामुळे यादोघांतून एक गोलंदाज निवडायचा झाला तर, कोहली अनुभवाचा प्राधान्य देत इशांतचीच निवड करण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात, ब्रिस्बेन कसोटीतील कामगिरीच्या आधारे सिराजचे पारडे जड असून निवड समितीचाही संघव्यवस्थापनावर दबाव राहणार आहे. फिरकी गोलंदाजीमध्ये संघात तिन गोलंदाज खेळवण्याकडेच कल राहिल. त्यात रवीचंद्रन अश्विन याची जागा निश्चित असून अन्य दोन जागांसाठी वॉशिंग्टन सुंदर, अक्सर पटेल व कुलदीप यादव यांच्यात स्पर्धा रंगेल. गोलंदाजीसह फलंदाजीचा निकष लावला गेला तर सुंदर व पटेल यांनाच संधी मिळण्याची शक्यता जास्त राहिल.
भारताची फलंदाजी सशक्त असून कर्णधार कोहली संघात परतल्यामुळे भारतीय संघाची ताकद वाढली आहे. त्यातही कोहलीची इंग्लंडविरुद्ध मायदेशातील कामगिरी तगडी असल्यामुळे तोच भारताचा एक्का असेल. सलामीला हिटमॅन रोहित शर्माच्या साथिला शुभमन गिलच डावाची सुरूवात करेल. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, कोहली, अजिंक्य रहाणे अशी तगडी मधली फळी असेल. त्यानंतर ब्रिस्बेन कसोटी विजयाचा शिल्पकार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत असेल. त्यानंतर सुंदर व पटेल हे देखील उपयुक्त फलंदाजी करत असल्यामुळे या सामन्यात भारताची फलंदाजी 8 व्या क्रमांकापर्यंत खोलवर बनेल. इंग्लंडच्या संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांनीही श्रीलंकेत अफलातून कामगिरी केली आहे. मात्र, त्यांच्या पहिल्या तीन फलंदाजांना येत असलेले अपयश त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
सलामीवीर जॅक क्राऊलीच्या जागी संघात आलेला ऑलिव्हर पोप, डॉमनिक सिबली व जॉनी बेअरस्टो यांना सक्षम पर्यायही त्यांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या फलंदाजीचा मुख्य भार रूट याच्यासह जोस बटलर व डॅनियल लॉरेन्स यांच्यावरच राहणार आहे. उपयुक्त फलंदाजी करण्याची गुणवत्ता असलेला डॉमनिक बेस हा भारताच्या गोलंदाजांवर भारी पडू शकतो.
त्याची प्रथम दर्जाच्या सामन्यातील गेल्या दोन मोसमातील कामगिरी अनेकांच्या कौतुकाची बाब ठरली आहे. त्याच्यासह मार्क वुड देखील एक चांगला अष्टपैलू ठरू शकतो. त्यांची फलंदाजी जरी भारतापेक्षा कमकुवत वाटत असली तरीही त्यांची गोलंदाजी भारतीय फलंदाजांवरही भारी ठरू शकते. ऍण्डरसन व आर्चर यांच्यासह वुड, बेस, सॅमसुरेन व जॅक लीच हे देखील गुणवान गोलंदाज आहेत. त्यात कुरेन याला आयपीएलचा अनुभव असल्याने भारताच्या मधल्या फळीसाठी तो डोकेदुखी ठरू शकतो.
मायदेशातील इतिहास बाजूने……
मायदेशातील इतिहासही भारताच्याच बाजूने आहे. मायदेशात खेळल्या गेलेल्या 35 सामन्यात भारतीय संघाने केवळ एकच सामना गमावला आहे.
सलग 12 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या 2016-17 मधील मालिकेत भारताने 4-0 असा विजय मिळविला होता.
पंड्याला कसे खेळवणार……
दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेल्या अष्टपैलु हार्दिक पंड्या याला या कसोटी मालिकेत संधी मिळणार असे वर्तवण्यात आले असले तरीत्याला संघात कोणत्या जागेवर खेळवणार हा प्रश्न उपस्थित होणार आहे. तसेच त्याला संघात स्थान द्यायचे असेल तर कोणाला बाहेर ठेवायचे याबाबत निवड समितीसमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे निदानया कसोटी सामन्यासाठीतरी त्याला संघाबाहेरच राहावे लागणार असल्याचेच दिसत आहे.