अहमदाबाद – इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना येथे प्रकाशझोतात गुलाबी चेंडूवर खेळवला जाणार आहे. येत्या बुधवारपासून सुरू होत असलेल्या या सामन्यासाठी भारतीय संघात अष्टपैलू हार्दिक पंड्या याचा समावेश होण्याचे संकेत मिळत आहेत.
संघात तीन वेगवान गोलंदाजांचाही समावेश होण्याची शक्यता असून पंड्याच्या समावेशाने संघाची गोलंदाजी तसेच फलंदाजी तगडी करण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. संघात रवीचंद्रन अश्विन, अक्सर पटेल या दोनच फिरकी गोलंदाजांना खेळवण्याचा विचार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरीही जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा यांच्या जोडीला महंमद सिराजची निवड होण्याचेही संकेत आहेत. असे झाल्यास फिरकीची बाजू केवळ अश्विनच सांभाळेल.
मालिकेत दोन्ही संघ सध्या 1-1 अशा बरोबरीवर आहेत. पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना जिंकला होता. आता तिसरा तिसरा सामना प्रकाशधोतात खेळवला जाणार असून या सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
इंग्लंडच्या तुलनेत भारतीय संघाकडे प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळण्याचा अनुभव कमी आहे. भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. रोहित शर्मा हाच शुभमन गिलसह डावाची सुरूवात करेल. मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्यावरच संघाची मदार राहणार आहे.
यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या पाठोपाठा पंड्याच्या समावेशाने संघाची ताकड वाढणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आलेला बुमराहला तिसऱ्या कसोटीसाठी संघात परतेल. तसेच सिराजचाही समावेश निश्चित मानला जात आहे. कुलदीप यादवच्या जागी पंड्याचा समावेश होण्याची शक्यता जास्त आहे.
भारताचा संभाव्य संघ – रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.