-अमित डोंगरे
चेन्नई कसोटी जिंकून भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली. हा विजय केवळ संघातील खेळाडूंसाठीच नव्हे तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा होता जो भारतीय संघाचा चाहता आहे. खेळाडूंना अपयश आले की जितके ते निराश होतात तशीच अवस्था चाहत्यांचीही होते. मात्र, हा सामना जिंकून संघाने गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला. आता दोन्ही संघ अहमदाबादला उरलेले दोन कसोटी सामने खेळण्यासाठी रवाना होतील. अर्थात या सामन्याला अद्याप बराच कालावधी असल्याने खेळाडूंना काहीशी विश्रांतीही मिळेल.
या सामन्याचे अवलोकन करायचे झाले तर एकीकडे हा विजय सांघिक वाटत असला तरीही त्यात केवळ दोन-चार खेळाडूच यशस्वी ठरले असे म्हणता येईल. इथे खेळाडूंना कमी लेखण्याचा उद्देश नाही तर ज्या खेळाडूंनी या सामन्यातील विजयात आपले योगदान दिले त्याचे कौतुक करण्याचा हा प्रयत्न आहे. खरे सांगायचे तर पहिल्या डावात रोहित शर्माने दीडशतकी खेळी केली. त्यात ऋषभ पंत व अजिंक्य रहाणेनेही आपापला वाटा उचलला.
दुसऱ्या डावात पदार्पणवीर अक्सर पटेलने पाच गडी बाद केले. मात्र, खरा गेमचेंजर ठरला तो रवीचंद्रन अश्विन. त्याने पहिल्या डावात पाहुण्यांचा निम्मा संघ गारद केला व त्यामुळेच भारतीय संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली. दुसरा डाव सुरू झाल्यावर भारतीय संघाचाही पाय खोलातच गेला होता. त्यावेळी तारणहार बनून पुन्हा अश्विनच मदतीला धावून आला. या डावात कोहलीनेही अर्धशतकी खेळी केली पण त्यानंतरही डाव घसरलाच होता.
पहिल्या डावातील दीडशतकवीर रोहित अपयशी ठरला. पाठोपाठ चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, ऋषभ पंत व अजिंक्य रहाणे सगळे एकेक बुरूज पडत असताना रॉक ऑफ जिब्राल्टरसारखा अश्विन पुन्हा एकदा उभा राहिला. नुसताच उभा राहिला नाही तर त्याने कोहलीच्या साथीत संघाचा डाव सावरला व कोहली बाद झाल्यानंतरही तळातील फलंदाजांना हाताशी घेत थाटात शतकी खेळी केली व संघाला चारशेपेक्षाही जास्त धावांची आघाडी मिळवून दिली. ही खेळी अश्विनच्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वात मोलाची खेळी छरली आहे.
फलंदाजीला आठव्या क्रमांकावर येत अशी दडपणाखाली सहजसुंदर खेळी करणे सोपी गोष्ट नाही. त्याने संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटून टाकले. हे काम अश्विन गेल्या काही महिन्यात सातत्याने करत आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यावर ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाची प्रतिष्ठा अश्विनने अनेक सामन्यात वाचवली. त्याने सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन कसोटीत आपल्या जिद्दी व लढाऊ बाण्याची प्रचिती सातत्याने दिली. त्याला तळातील फलंदाज असे टोमणेही ऐकावे लागले, वर्णद्वेषी टीकाही सहन करावी लागली. मात्र, त्याने त्याला जे काही बोलायचे आहे ते बॅटने व्यक्त केले.
त्याच्याकडे फलंदाजीची गुणवत्ता आहे हे देशांतर्गत सामन्यांत अनेकदा दिसून आले होते मात्र, जेव्हा त्याने चेन्नईच्या खेळपट्टीबाबत आपले मत व्यक्त केले तेव्हा त्याची हेटाळणी केली गेली. या खेळपट्टीवर फलंदाजाने संयम दाखवला तर मोठी खेळी करता येऊ शकते असे अश्विन म्हणाला होता. त्यावर माजी कसोटीपटू आकाश चोप्राने खोचक टीका केली होती. मात्र, अपणच बरोबर आहोत हे अश्विनने स्वतः शतकी खेळी करून दाखवून दिले व टीकाकारांचे दात त्यांच्याच घशात घातले.
खुद्द विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही अश्विनच्या या खेळीचे कौतुक केल्यावर आणखी कोणत्याच प्रशस्तीपत्रकाची गरज नाही. दोन्ही संघातील केवळ एकच फरक सांगायचा झाला तर इंग्लंडचे बलाढ्य व नावाजलेले अष्टपैलू जिथे अपयशी ठरले तिथे भारतासाठी अश्विन यशस्वी ठरला. केवळ यशस्वीच ठरला असे नाही तर आता त्याच्याकडे भविष्यातही रवींद्र जडेजासारखेच अष्टपैलू म्हणून पाहिले जाईल. लगेच त्याची तुलना कपिल देव किंवा जडेजाशी करणे योग्य नाही. या दोन खेळाडूंइतका तो यशस्वी ठरेल का ते आत्ताच सांगता येणार नाही पण त्याला आता कोणी कमी लेखणार नाही हे मात्र निश्चित.
मालिकेतील उर्वरीत कसोटी सामन्यांमध्येही तो अशाच यशस्वी कामगिरीत सातत्य राखेल असा विश्वास त्याने दिला आहे. या संपूर्ण सामन्यात अश्विन हाच गेमचेंजर ठरला यात शंका नाही.