चेन्नई – केंद्र व राज्य सरकारने प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील बंधने उठविल्यानंतर तमिळनाडू क्रिकेट संघटनेने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुसऱ्या कसोटीपासून पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. मात्र, या संदर्भात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने याबाबत आपल्याला बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे मत व्यक्त केले आहे.
इंग्लंडविरुद्ध पहिले दोन कसोटी सामने चेन्नईत होणार आहे. सरकारच्या निर्णयानंतर तमिळनाडू संघटनेने थेट दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पन्नास टक्के उपस्थितीचा निर्णय घेतला. दुसरा कसोटी सामना 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे सचिव रामासामी यांनी आम्ही या संदर्भात बीसीसीआयकडे अधिकृत परवानगी मागितली असल्याचे सांगितले.
बीसीसीआयने या पूर्वीच पहिले दोन कसोटी सामने प्रेक्षकांशिवाय होतील असा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या व चौथ्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी मान्यता दिल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. हे दोन्ही सामने अहमदाबाद मध्ये मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत.
सरकारने प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील मर्यादा उठविल्यानंतर अजून कुठलाही अधिकृत सामना झालेला नाही. प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी संयजोकांना करोनाबबातच्या नियमांची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सरकारने काही मार्गदर्शक अटी घालून दिल्या आहेत, त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारी, तर दुसरा सामना 13 फेब्रुवारीपासून होणार आहे.
पंतप्रधान उपस्थित राहणार
अहमदाबादमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमवरील पहिल्या कसोटी सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रित केले असल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे या सामन्याला हायप्रोफाईल व्यक्तींची उपस्थिती राहणार आहे.