लंडन – एजबस्टन येथे भारत व इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी लांबणीवर टाकलेला एकमेव कसोटी सामना येत्या 1 जुलैपासून खेळवला जाणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा करोना बाधित झाल्याने या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्याच या अपूर्ण राहिलेल्या मालिकेतील कसोटीसाठी त्यावेळचाच कर्णधार विराट कोहली यालाच या सामन्यासाठी कर्णधार करावे अशी मागणी होत आहे.
गेल्यावर्षी स्थगित करण्यात आलेला हा कसोटी सामना कोहलीच्याच नेतृत्वात भारतीय संघाने खेळावा व कोहलीच्या कर्णधारपदाखाली सुरू झालेली मालिका त्याच्याच नेतृत्वात पूर्ण व्हावी, अशी मागणी माजी कसोटीपटू आकाश चोप्रासह चाहत्यांनीही केली आहे.
रोहित खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत किंवा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहकडे संघाचे नेतृत्व येण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, रोहितच्या अनुपस्थितीत कोहली हाच सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्याचवेळी रोहितकडे ही जबाबदारी सोपवली गेली.
इंग्लंडविरुद्धच्या या एकनेव कसोटीत रोहितच नेतृत्व करणार होता. मात्र, लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान रोहितला करोनाची बाधा झाल्याने त्याला सहा दिवसांसाठी विलगीकरणात पाठवले गेले आहे. त्यामुळे या कसोटी तो खेळण्याची शक्यता धूसर बनली आहे.