बर्मिंगहॅम – जॉनी बेअरस्टो याने फटकावलेल्या शतकानंतरही भारताविरुद्धच्या येथे सुरु असलेल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर संपूष्टात आला. त्यानंतर चहापानापर्यंतच्या खेळात भारताने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 37 धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील 132 धावांच्या आघाडीसह भारताकडे आता एकूण आघाडी 169 धावांची आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या सर्व आघाड्यांवर सरस कामगिरी करत भारताने या कसोटीवर पकड मिळवली आहे.
भारताने या कसोटीत पहिल्या डावात ऋषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 416 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर संपला व भारताने 132 धावांची मोठी आघाडी घेतली. इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली होती. सामन्याचा दुसऱ्याच दिवशी शनिवारी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा 5 बाद 84 असा निम्मा संघ तंबूत पाठवला होता. त्यानंतर मात्र, बेअरस्टोने अफलातून फलंदाजी करत शतक फटकावले.
बेअरस्टोला सॅम बिलिंग्ज, ज्यो रूट व कर्णधार बेन स्टोक्सने थोडीफार साथ दिल्यामुळे त्यांना फॉलोऑनची नामुष्की टाळता आली. बेअरस्टोने आपल्या 106 धावांच्या खेळीत 140 चेंडूत 14 चौकार व 2 षटकार फटकावले. तो धोकादायक ठरेल असे वाटत असतानाच महंमद शमीने त्याला बाद करत संघाच्या मार्गातील अडसर दूर केला. दुसरीकडे महंमद सिराजने त्यांच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद करत त्यांचा डाव लवकर गुंडाळला. भारताकडून सिराजने सर्वाधिक 4 गडी बाद केले. कर्णधार व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 3 गडी बाद केले. शमीने 2 तर, शार्दुल ठाकूरने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 416. इंग्लंड पहिला डाव – 61.3 षटकांत सर्वबाद 284 धावा. (जॉनी बेअरस्टो 106, सॅम बिलिंग्ज 36, ज्यो रूट 31, बेन स्टोक्स 25, महंमद सिराज 4-66, जसप्रीत बुमराह 3-68, महंमद शमी 2-78, शार्दुल ठाकूर 1-48).