अहमदाबाद – कसोटी क्रिकेटची क्रुर थट्टा ठरावी असा सामना गुरूवारी येथे संपला. पाच दिवसांच्या या सामन्याचा केवळ दोनच दिवसांत निकाल लागला. निचांकी धावसंख्येच्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला व चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या विजयाच्या जोरावर आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा आपला दावा आणखी भक्कम केला.
नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय पिरकीसमोर त्यांची दाणादाण उडाली व त्यांचा पहिला डाव केवळ 112 धावांत संपला. त्यांचा सलामीवीर जॅक क्राऊलीने अर्धशतकी खेळी केली अन्यथा त्यांच्या धावसंख्येचे शतकही पूर्ण होऊ शकले नसते. त्यानंतर भारतीय संघाची एकवेळ 3 बाद 98 अशी स्थिती असताना त्यानंतरचे 7 गडी अवघ्या 47 धावांत बाद झाले व भारताचा पहिला डाव 145 धावांवर संपला.
सलामीवीर रोहित शर्माने 66 धावाची खेळी केली व त्यामुळे भारतीय संघाला 33 धावांची आघाडी घेता आली. इंग्लंडचा कर्णधार व पार्टटाईम फिरकी गोलंदाज ज्यो रूटने 5 गडी बाद केले. त्याला साथ देताना जॅक लिचने 4 गडी बाद केले. त्यानंतर इंग्लंडने आपला दुसरा डाव सुरू केल्यावर पुन्हा एकदा भारतीय फिरकीसमोर त्यांची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
पहिल्या डावात त्यांना नाचवणाऱ्या अक्सर पटेलने याही डावात त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली. त्याने या डावात 5 गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देताना अश्विनने 4 गडी बाद केले. त्यांच्या या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 81 धावांवर संपूष्टात आणला. तेव्हा भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी 49 धावांची गरज होती.
भारताचा दुसरा डाव उपहारापूर्वी सुरू झाला. हा ब्रेक संपल्यावर सलामीवीर रोहित शर्माने पहिल्या डावाप्रमाणे याही डावात धिरोदात्तपणे फलंदाजी केली. त्याला शुभमन गिलनेही तोलामोलाची साथ दिली. या जोडीने नाबाद 49 धावांची भागीदारी करत सामना जिंकून दिला. रोहितने नाबाद 25 तर गिलने नाबाद 15 धावा केल्या. या सामन्यात वेगवान गोलंदाज केवळ नावापुरतेच उरल्याचे चित्र दिसले.
या खेळपट्टीवर टीकाही बरीच रंगली असली तरीही दोन्ही संघातील प्रमुख फलंदाजांची बाद होण्याची पद्धत पाहिल्यावर खेळपट्टी खराब नव्हती तर त्यांचे शॉटसिलेक्शन चुकल्याचे स्पष्ट दिसत होते. अर्थात काही प्रमाणात या खेळपट्टीने फिरकी गोलंदाजांना पहिल्या दिवसापासून साथ दिली. मात्र, मायदेशात खेळण्याचा भारतीय संघाला लाभ झाला. आता चौथा सामना अनिर्णित राहिला तरी भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला पात्र ठरेल.
रवीचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 व्या बळींची नोंद केली. तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चरला बाद करत अश्विनने हा पल्ला गाठला. 400 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा जगातील 17 वा तर, भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कपील देव, अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांनी ही कामगिरी केली आहे. 2011 साली कसोटी पदार्पण करणाऱ्या अश्विनने 77 व्या कसोटी सामन्यात 400 बळींचा टप्पा पार केला आहे.
इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 112. भारत पहिला डाव – 53.2 षटकांत सर्वबाद 145 धावा. (रोहित शर्मा 66, विराच कोहली 27, रवीचंद्रन अश्विन 17, शुभमन गिल 11, इशांत शर्मा नाबाद 10, ज्यो रूट 5-8, जॅक लिच 4-54, जोफ्रा आर्चर 1-24). इंग्लंड दुसरा डाव – 30.4 षटकांत सर्वबाद 81 धावा. (बेन स्टोक्स 25, ज्यो रूट 19, ऑलिव्हर पोप 12, अक्सर पटेल 5-32, रवीचंद्रन अश्विन 4-48, वॉशिंग्टन सुंदर 1-1). भारत दुसरा डाव – 7.4 षटकांत बिनबाद 49 धावा. (रोहित शर्मा नाबाद 25, शुभमन गिल नाबाद 15, अवांतर 9).