अहमदाबाद – इंग्लंडविरुद्ध झालेला पहिला टी-20 सामना भारताने गमावल्यानंतर सोशल मीडियावर संघाच्या कामगिरीवर टीका होत आहे. हिटमॅन रोहित शर्माला वगळण्याच्या निर्णयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या सुमार कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात कोहली आदिल रशिदच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. आंतरारष्ट्रीय कारकिर्दित प्रथमच असे घडले आहे की कोहली सलग दोन्ही डावात शून्यावर बाद झाला. विराटच्या 475 डावात असे प्रथमच घडले आहे.
टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध कोहली यापूर्वी कधीच शून्यावर बाद झाला नव्हता. चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटीत मोइन अलीने विराटला बाद केले होते. याआधी विराट चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीने अत्यंत सुमार कामगिरी केली आहे. तो गेल्या पाच आंतरराष्ट्रीय डावात 3 वेळा शून्यावर बाद झाला आहे. गेल्या पाच डावात त्याने 0, 62, 27, 0, 0 अशा धावा केल्या आहेत.