सॅन्टियागो – भारताच्या महिला हॉकी संघाने तुलनेने प्रबळ असलेल्या चिली संघाचा 3-2 असा रोमहर्षक लढतीत पराभव केला. या सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी खेळ उंचावला व सामना जिंकला.
सामन्याला प्रारंभ झाल्यावर चिलीच्या फर्नांडा विलेग्रानने 21 व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर 39 व्या मिनिटाला दीपिकाने गोल करत बरोबरी साधून दिली. त्यानंतर पुन्हा एकदा भारताच्या महिला खेळाडूंनी अप्रतिम आक्रमण करताना चिलीवर वर्चस्व राखले.
संगीता कुमारीने 45 व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर लारी नंदीकीने 47 व्या मिनिटाला गोल करताना संघाली आघाडी 3-1 अशी वाढवली होती. मात्र, त्याचवेळी भारताचा बचाव कमी पडला व चिलीच्या सिमोन एव्हिलेने 56 व्या मिनिटाला गोल केला.
मात्र, यानंतर भारताच्या बचावपटूंनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर चिलीला गोल करण्यात अपयश आले व भारतीय संघाने हा सामना 3-2 अशा फरकाने जिंकला.