मुंबई – आशिया करंडक स्पर्धेतील पराभवानंतरही भारतीय संघातील खेळाडू काहीही शिकले नाहीत. संघात अनुभवी व नवोदितांचा समतोल असायला हवा होता कारण पुढील महिन्यात भारतीय संघाला टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळायची आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील संघ निवड पाहिली तर नवोदित कुठे गायब झाले असा प्रश्न पडतो, अशा शब्दात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी ताशेरे ओढले आहेत.
मोहालीतील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. भारताने दिलेले 209 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज पार केले. भारतीय संघाची फलंदाजी, गोलंदाजी व मुख्य म्हणजे क्षेत्ररक्षण अत्यंत ढिसाळ झाले. रवींद्र जडेजा मैदानावर असेल तर क्षेत्ररक्षण अफलातून होत होते. आता त्याला दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागल्याने त्याच्या जागी अक्सर पटेलचा समावेश झाला. मात्र, जडेजा नसल्याने क्षेत्ररक्षणाचा दर्जा किती घसरला आहे हेच या सामन्यात दिसले, असेही शास्त्री म्हणाले.
अंतिम संघ निवडला जातो तेव्हा त्यात एखादाच बदल झालेला दिसतो. जर त्याच त्या खेळाडूंना खेळवायचे असेल तर नवोदितांना संधी कधी मिळणार. आगामी काळात होत असलेल्या नहत्त्वाच्या मालिकांसाठी नवोदितांना संधी देत त्यांची क्षमता आजमावून पाहणे गरजेचे असते. मात्र, सध्या भारतीय संघात हे दिसत नाही मग सेकंड बेच म्हणता ते नवोदित खेळाडू कुठे गायब झाले, असा सवालही शास्त्री यांनी केला आहे.
बुमराह व चहर पर्यटक आहेत का?
जसप्रीत बुमराहला कसे खेळवले गेले नाही तसेच त्याच्या जागी हर्षल पटेलची निवड कशी केली गेली. जर बुमराह तंदुरुस्त ठरला आहे तर त्यालाच खेळवले गेले पाहिजे. मात्र, काही कारणांनी बुमराह खेळणार नसेल तर मग दीपक चहरला संघात स्थान देणे गरजेचे होते. उमेश यादवपेक्षा तो जास्त उपयुक्त ठरला असता. भारतीय संघाने या पराभवातून बोध घेत आगामी सामन्यांत यश मिळवण्यासाठी क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करणे आवश्यक आहे, असेही शास्त्री म्हणाले.