दुबई – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघातून दुखापतीमुळे वगळण्यात आलेल्या रोहित शर्माचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. या दौऱ्या अद्याप अवधी असल्याने त्यापूर्वी रोहित पूर्ण मॅचफिट ठरला तर त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असे निवड समितीच्याच एका सूत्राने सांगितले आहे.
भारतीय संघ आयपीएल स्पर्धा संपल्यावर अमिरातीतूनच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ 3 एकदिवसीय, 3 टी-20 तसेच 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयपीएल स्पर्धेत रोहितला दुखापत झाल्याने त्यांला विश्रांतीची गरज असल्याचा अहवाल बीसीसीआयच्या फिजीओने दिल्यामुळे या मालिकेसाठी भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आले नव्हते.
मात्र, त्याचवेळी रोहितने मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात फलंदाजीचा जोरदार सराव केल्याचे संघाने पोस्ट केलेल्या व्हिडीओत स्पष्ट होत होते. त्यामुळे त्याला संघातून वगळण्याच्या निवड समितीच्या निर्णयावर प्रचंड टीका सुरु झाली होती. तसेच त्याला संघाबाहेर ठेवण्यामागे बीसीसीआय व कर्णधार विराट कोहली यांनी राजकारण केल्याचेही सांगितले जात होते. निवड समितीच्या सूत्राने यात तथ्य नसल्याचे सांगत जर रोहित येत्या काही दिवसांत तंदुरुस्त ठरला तर त्याचा कसोटी मालिकेसाठी विचार केला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
जर रोहितला दुखापत झाली आहे व त्याला विश्रांतीची गरज आहे तर तो मुंबईच्या सराव सत्रात सराव कसा काय करत आहे, अशी विचारणा करत विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्यासह अनेकांनी केली होती. तसेच त्याच्या दुखापतीचे स्वरूप बीसीसीआयने जाहीर करावे, अशी मागणीही गावसकर यांनी केली होती. याबाबतचा सस्पेन्स वाढत होता, त्यामुळेच बीसीसीआयने आपली बाजू जाहीर केली.
फिजीओने दिलेल्या अवहालाच्या आधारावरच प्रत्येक सामन्यासाठी संघ निवड केली जाते, असे बीसीसीआयने सांगितले होते. मात्र, येत्या काही दिवसांत त्याच्या तंदुरुस्तीकडे तसेच प्रगतीकडे लक्ष ठेवले जाणार असून तो जर मॅचफिट ठरला तर त्याला या मालिकेसाठी संघात स्थान देण्याचा विचार निश्चितच केला जाईल, असे मत या सूत्राने व्यक्त केले आहे.