प्राणवायूचा पुरवठा थांबल्याने काम थांबले : पगार होताच कामगारांनी धरली गावची वाट
पिंपरी – ऑक्सिजनचा पुरवठा सध्या पूर्णपणे वैद्यकीय क्षेत्रास होत असल्याने उद्योगांचा श्वास कोंडला आहे. तसेच वेल्डिंग रॉड, इतर लहान मोठा कच्चा माल पुरविणारी दुकाने निर्बंधांनुसार बंद असल्याने हातात काम असूनही उद्योगनगरीतील 50 ते 60 टक्के उद्योगांचे काम ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
क्षमता असलेल्या उद्योगांनी कटिंगच्या कामासाठी लाखो रुपयांच्या मशीन विकत घेतल्या आहेत. तर लहान उद्योजकांना हे शक्य नसल्याने ऑक्सिजनअभावी त्यांचे काम थांबले आहे. दुसरीकडे करोनाची धास्ती वाढत असल्याने कामगारांनी हातात पगार येताच गावाकडची वाट धरली आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये अनेक उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.
उद्योगनगरीतील इंजीनियरिंग व ऑटोमोबाइल क्षेत्रातील अनेक उद्योगांचे काम ऑक्सिजनशिवाय होऊ शकत नाही. याला पर्याय म्हणून प्लाझ्मा मशील आणि कॉम्प्रेसर आले आहेत. परंतु सर्वच उद्योजकांना हे विकत घेणे शक्य नाही. उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याने उद्योग आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कारखान्यातील ही परिस्थिती व शहरात वाढता करोना पाहून कामगारांनी पगार होताच आणि वीकेंड लॉकडाऊन संपताच सोमवारी आपपल्या गावची वाट धरली.
पगार करण्याचीही भीती
अनेक कामगारांचे अजून पगार झाले नसल्याने त्यांनी उद्योजकांकडे पैसे मागण्यास सुरुवात केली आहे. या कामगारांना पगार किंवा ऍडव्हान्स दिल्यास ते तातडीने गावी निघून जातील, अशी भीती अनेक उद्योजकांना सतावत आहेत. उद्योगांचे पगार दर महिन्याच्या सात ते पंधरा तारखे दरम्यान होतात. ज्यांचे पगार झाले आहेत, त्यापैकी अनेकांनी उद्योगनगरीला राम-राम ठोकला आहे. कारखान्यांमध्ये काम होत नसल्याचे कामगारांच्याही लक्षात आले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आपल्याला पुढील पगारही मिळणार नाही, अशी भीती मनात घेऊन काहींनी मालकांना न सांगताच पळ काढला असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
सोडव्या लागल्या अतिरिक्त बस
गेल्या वर्षभरापासून एसटीचा तोटा सातत्याने वाढत आहे. एसटी सेवा पुन्हा सुरु झाल्यानंतर प्रवासीच नसल्याने वल्लभनगर आगारातील अनेक नियमित एसटी बसच्या फेऱ्या व्यवस्थापनाला रद्द कराव्या लागल्या होत्या. परंतु सोमवारी अचानकच प्रवासी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की नियमित सर्व बस फुल्ल झाल्या आणि वल्लभनगर आगार व्यवस्थापनाला अतिरिक्त बस सोडाव्या लागल्या. वल्लभनगर आगारातून नियमित 30 व अतिरिक्त पाच अशा 35 बस भरुन नागरिकांनी आज शहर सोडले. यात प्रामुख्याने सोलापूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या मार्गांवरील बस होत्या. गतवर्षी अनेकांना पायपीट करावी लागली होती. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास गेल्यावर्षी सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी त्याआधीच अनेकांनी आपल्या गावाकडची वाट धरली आहे.