मुंबई – करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी झाल्यामुळे बऱ्याच राज्यातील निर्बंध दूर करण्यात येत आहे. आंध्र आणि महाराष्ट्रातील निर्बंधही वेगाने कमी होत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक वाढवून व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत.
त्यामध्ये हैदराबाद आणि पुणे शहर अग्रस्थानावर असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. रविवारी संपलेल्या आठवड्यामध्ये नोमुरा इंडिया बिझनेस रिझम्शनन इंडेक्स वाढून 105 अंकावर गेला आहे. त्या अगोदरच्या आठवड्यामध्ये हा निर्देशांक 100.5 अंकांवर होता.
मोबाईल ऍपच्या माध्यमातून वाहतुकीची माहिती संकलित केली जात आहे. या आकडेवारीनुसार पुणे आणि हैदराबाद मधील वाहतूक वेगाने पूर्वपदावर येत आहे. या कालावधीत या शहरातील जीएसटी ई -वे बिलची संख्या वाढली आहे. रेल्वे आणि इतर महसुलातही वाढ झाली आहे. गुगल वर्कप्लेस इंडेक्स मध्येही या काळामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या शहरातील विजेचा वापर वाढत वाढत आहे. त्याचबरोबर कामगारांच्या कामावर जाण्याच्या संख्येतही वाढ होत आहे.
उत्सवात खरेदी वाढणार
उत्सवाच्या काळात भारतामध्ये एकूण वार्षिक खरेदीच्या 30 टक्के इतकी खरेदी होत असते. या काळात ही खरेदी वाढेल अशी अपेक्षा कंपन्या आणि व्यापाऱ्यांना आहे. त्यामुळे विविध वस्तूंचा पुरवठा वाढविण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. या काळामध्ये कंपन्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळत असतो. त्यामुळे त्या काळात खरेदी वाढेल असे बऱ्याच जणांना वाटते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये वाहतुकीमध्ये असलेले अडथळे दूर करण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.