मुंबई – करोनाव्हायरसमुळे पसरलेल्या कोव्हिड19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या जग झपाटयाने बदलत असून, नवोन्मेष आणि सृजनशीलता हे उद्योगजगताचे आधारस्तंभ असले तरी, उद्योजकांनी बदलत्या काळाशी आणि गरजांशी जुळवून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी केले आहे.
नव्या उद्योजकांच्या “टेकस्पार्क्स’ नावाच्या ऑनलाईन उपक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी “काळानुरूप विकसनशील देशांतील बदलत्या गरजा’ या विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन केले.
भारत आणि जगातील प्रमुख समस्यांवर प्रकाश टाकताना त्यांनी मानवतावादाचा संघर्ष, उपासमार आणि जागतिक अन्न तुटवडा यांवर भाष्य केले. तसेच अवकाशयुगीन आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाचा व्यवसाय वाढीसाठी वापर केला पाहिजे.
आपण जो व्यवसाय करतो तो केवळ एका देशापुरता मर्यादित नसून, जगाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करीत असतो. त्या अनुषंगाने प्रत्येकाचे वर्तन आणि आचरण असले पाहिजे. “नम्रता’ हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे.
केवळ मूल्यनिर्मितीसाठीच नव्हे, तर मानव कल्याणासाठी आपण कोणत्या प्रकारे योगदान देऊ शकतो, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असेही टाटा यावेळी म्हणाले.