Pune District : इंद्रायणी : पावित्र्य की रसायनांचे मरणपाश?
Pune District : सर्व स्थानिक संस्थांकडून 100 टक्के सांडपाणी प्रक्रिया (एसटीची) अनिवार्य करणे. ‘नमामी इंद्रायणी’सारख्या उपक्रमांतून लोकसहभाग वाढवणे हे गरजेचे आहे.

चिंबळी : इंद्रायणी नदी – आळंदी आणि देहू यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांतून वाहणारी इंद्रायणी नदी आज आपल्या अस्तित्वासाठी झुंज देताना दिसत आहे. ज्या नदीच्या काठावर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी भक्तीची परंपरा रुजवली, तीच नदी आता औद्योगिक प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे ‘विषारी’ बनत चालली आहे.
इंद्रायणी नदीच्या पात्रात रसायनमिश्रित सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नदीवर पांढर्या फेसाचे थर साचल्याची दृश्ये वारंवार समोर येत असून, ही परिस्थिती पर्यावरणीय आणीबाणीची घंटा ठरत आहे.
नदी वाचली, तरच संस्कृती वाचेल हे वास्तव लक्षात घेऊन तातडीने ठोस उपाय आवश्यक आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कडून कठोर कारवाई, सर्व स्थानिक संस्थांकडून 100 टक्के सांडपाणी प्रक्रिया (एसटीची) अनिवार्य करणे. ‘नमामी इंद्रायणी’सारख्या उपक्रमांतून लोकसहभाग वाढवणे हे गरजेचे आहे.
इंद्रायणी नदीचे प्रदूषण हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही, तर सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेचाही विषय आहे. जर वेळेत कठोर पावले उचलली नाहीत, तर ‘भक्तीची वाहिनी’ म्हणून ओळखली जाणारी ही नदी भविष्यात ‘मृत प्रवाह’ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून या विषारी प्रवाहावर लगाम घालणे ही काळाची गरज आहे.
प्रदूषणाची प्रमुख कारणे
औद्योगिक सांडपाणी : पिंपरी-चिंचवड, तळवडे आणि चाकण परिसरातील काही उद्योगांकडून प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी ओढ्यांमार्फत नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास येते.
नागरी सांडपाणी : नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रांतील सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया (डढझ) न करता ते थेट नदीत सोडले जाते.
फेसाचे साम्राज्य : डिटर्जंट्स आणि फॉस्फेटयुक्त रसायनांमुळे नदीवर पांढरा फेस साचतो, जो जलचरांसाठी घातक आहे.
जलपर्णीचा फैलाव : सांडपाण्यातील पोषक घटकांमुळे जलपर्णी वाढते आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते.
परिणाम गंभीर
आरोग्यावर परिणाम : नदीकाठच्या गावांमध्ये दूषित पाण्यामुळे त्वचाविकार, पोटाचे आजार वाढत आहेत.
धार्मिक भावनांना धक्का : लाखो वारकरी स्नानासाठी येतात; मात्र दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे श्रद्धेला तडा जात आहे.
पर्यावरणीय हानी : मासे व जलचर मृत्युमुखी पडत असून नदीची परिसंस्था धोक्यात आली आहे.





