आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725व्या संजीवन समाधी सोहळ्याला आलेल्या दोघा भाविकांना चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. दोन घटनांमध्ये चोरट्यांनी 3 लाखाचे दागिने लंपास केले आहे. ही घटना (दि. 30) मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.
दत्तात्रय सीताराम खोकराळे (वय61, रा. खामुडी, सोमनाथनगर, ता. जुन्नर) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोकराळे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत माऊलींच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनापूर्वी हात पाय धुण्यासाठी ते इंद्रायणी घाटावर जात होते.
त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना धक्का देऊन खाली पाडले. त्यांच्या गळ्यातील 2 लाख 40 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने ओढून चोरून नेली. तर दुसऱ्या घटनेत एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ हिसकावली. याप्रकरणी आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.