स्थानिकांमध्ये चर्चा : दुसऱ्या दिवशीही कारण अस्पष्ट, आता शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष
पुणे/देहूगाव – इंद्रायणी नदी पात्रात आणि किनाऱ्यावर रविवारी (दि. 9) दुर्मीळ महाशीर मासे हजारोंच्या संख्येत मृत अवस्थेत आढळले होते. प्रथमदर्शनी हे मासे जलप्रदूषणामुळे नदीतील प्राणवायूंचे प्रमाण कमी झाल्याने दगावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी काही अज्ञातांनी नदीपात्रात रसायनयुक्त द्रव्य मिसळल्याचे काही स्थानिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे नदीतील माशांवर विषप्रयोग झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण उलगडणार आहे. दरम्यान, प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी इंद्रायणी नदीपात्राला भेट देत पाहणी केली.
नदीतील प्रदूषणामुळे या माशांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील गेल्या दोन वर्षांपासून सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प तयार झालेला असून, मलनि:सरण वाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. सध्या ठिकठिकाणी या वाहिन्या जोडण्याचे जोडकाम अंतिम टप्प्यात आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 334 वा पालखी सोहळा बारा दिवसांवर येवून ठेपला आहे. देहूचे वैभव असणारे महाशीर (देवमासा) हजारोच्या संख्येत मृत पावण्याची तीन दशकांतील ही तिसरी मोठी घटना घडली. प्रशासन याकडे का दुर्लक्ष करीत आहे.
देहूगाव येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत लाखोंचा खर्च केला जातो. मात्र, मुलभूत व जीवनावश्यक असणाऱ्या नदी पाण्यावर का नाही. श्री क्षेत्र देहूगाव येथे इंद्रायणी नदीतील नादुरुस्त बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची गळती, नदी पडलेला राडारोड्याने पात्रातील पाण्याची पातळी प्रमाणात खालावलेली आहे. त्यामध्ये नदी काठावरील गावांचे आणि देहूगाव परिसरातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जात आहे. तसेच इंद्रायणीत जलपर्णी वाढत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ यावेळी करीत होते. ग्रामपंचायतीचे एक दोन सदस्य वगळता कोणीही इंद्रायणी नदीकडे फिरकले नसल्याने युवक वर्गाचा संताप वाढला होता.
प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सुनील कुलकर्णी, दिलीप खेडेकर, मत्स्य विभागाचे अधिकाऱ्यांनी सोमवारी नदीकाठी भेट दिली. पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. नदी पात्राची बोटीने पाहणी केली. नदी पात्रात येणारे मैलामिश्रित सांडपाणी, विकास कामातील होणारी दिरंगाई तसेच नदी पात्रातील होणारे जल प्रदूषणाच्या कारणांची तपासणी करून या दोषींवर कारवाई करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
यापूर्वी दोन वेळा घडला हा प्रकार
इंद्रायणी नदीत महाशीर या माशांचे प्रजोत्पादन प्रकल्प राबविण्यात येतो. त्यामुळे या परिसरात या माशांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. आकाराने मोठ्या असलेल्या या माशांचे आकर्षण अनेकांना असते. मात्र, याठिकाणी मासेमारीसाठी बंदी आहे. यामुळे देखील हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी 2004 आणि 2009 सालीदेखील अशाचप्रकारे हे मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडेकर यांनी सांगितले.