जकार्ता, (इंडोनेशिया) – इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये प्रचंड लोकसंख्येचा दाब वाढू लागला आहे. त्यामुळे आता राजधानी दुसऱ्या शहरात हलवण्याबाबत इंडोनेशियाकडून विचार सुरू झाला आहे. मात्र प्रत्यक्ष राजधानी दुसरीकडे हलवण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. सध्या जकार्तामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे राजधानीचे हे शहर अत्यंत दाटीवाटीचे आणि प्रचंड वाहतुक कोंडीचे बनले आहे. याशिवाय जकर्तामध्ये वारंवार पूर येत असतात. भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा केल्यामुळे जकार्ता वेगाने बुडायला लागलेल्या शहरांमध्ये सर्वात आघाडीवर आहे. दाटीवाटीने झालेली लोकवस्ती आणि पूरांमुळे जकार्ताला दरवर्षी अब्जावधी डॉलरचे नुकसान सोसावे लागते.
आता राजधानीचे शहर जकार्तापासून दूर जावा बेटावर हलवले जाईल. राजधानी दुसरीकडे हलवण्याच्या दीर्घकाळ प्रलंबित योजनेला अध्यक्ष जोको विदोदो यांच्याकडून मंजूरी मिळाली आहे, असे शहरी नियोजन मंत्री बाम्बांग ब्रोद्जोनेगोरो यांनी सांगितले. नवी राजधानी म्हणून बोमेओ बेटावरील पलंकाराया शहराचा विचार केला जाऊ शकतो.
आता पुढील काही वर्षे राजधानी आणि औद्योगिक शहर अशी दुहेरी जबाबदारी जकार्ताला पेलता येणार नाही. त्यामुळे विदोदो यांनी यावेळच्या निवडणूकीच्या प्रचारामध्येही नव्या राजधानीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. विदोदो यांना नुकतेच अध्यक्षपदासाठी आणखी एका टर्मसाठी मुदतवाढ मिळाली आहे.