कोल्हापूर – फेटे बांधून फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या निनादात औक्षण करत कोल्हापूरकरांनी पोलंडवासीयांचे वळीवडेमध्ये स्वागत केले. या ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्यात पोलंडवासीयांनी आपल्या स्मृतिंना उजाळा दिला. या भावनिक नात्याबरोबरच कोल्हापूर परिसरात उद्योग, व्यवसाय, सांस्कृतिक, पर्यटन यामध्ये आदान-प्रदान केले जाईल. दिल्लीप्रमाणे वार्सा ते मुंबई थेट हवाई वाहतूक सुरु करु, असे आश्वासन पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सीन प्रीझीदॅज यांनी दिली.
वळीवडे येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण श्री प्रीझीदॅज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पोलंडचे राजदूत ॲडम बूरॉकोस्की, पोलिश एअरलाईनचे अध्यक्ष मिल्झाक्झार्स्की, कौन्सुल जनरल डॅमियन आयर्झीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.
यानंतर झालेल्या सोहळ्याची सुरुवात दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने झाली. उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सुरुवातीला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांचे स्वागत करुन या ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्याची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले, कोल्हापूरकरांचे अभिवादन करण्यासाठी पोलंडचे हे शिष्टमंडळ इथे आले आहे. १९४३ ते १९४८ या ५ वर्षांच्या काळात पाच हजार पोलंडवासीय वळीवडेमध्ये छोट्या पोलंड देशाच्या स्वरुपात राहायला होते. या काळात इथली संस्कृती, इथले नियम त्यांनी शिस्तप्रीय पद्धतीने स्वीकारले होते. या वास्तव्याला पोलंडवासीय आपले दुसरं घर मानतात. या ऐतिहासिक ठिकाणी लवकरच संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मानवतेचा संदेश देणारे हे संग्रहालय असेल.
प्रधान सचिव गगराणी म्हणाले, ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संकल्पना मुख्यमंत्र्यांना खूप आवडली. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्यावतीने दिले. दुसऱ्या महायुद्धात सर्वाधिक जास्त नुकसान पोलंडचे झाले. इतिहासामधून दोन वेळा नामशेष करण्याचा प्रयत्न झालेला हा देश. अशा या देशातून ते आपल्या देशात येवून राहिले. कोल्हापूरकरांनी भरभरुन प्रेम आणि आपुलकी दिली. त्याबद्धल त्यांचे आभारही त्यांनी यावेळी मानले.
उपपरराष्ट्र मंत्री श्री प्रीझीदॅज म्हणाले, “कोल्हापूरकरांनी दिलेल्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत. दुसऱ्या महायुद्धामध्ये ९० टक्के शहर उद्धवस्त झाले होते. भारतातील गुजरातमधील जामनगर आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील महाराजांनी पोलंडवासियांना आश्रय दिला. केवळ आश्रयच दिला नाही तर त्यांच्यासाठी लागवणाऱ्या सेवा सुविधा यांचाही समावेश होता. वळीवडे येथे एक छोटासा पोलंड देश अस्तित्वात होता. कोल्हापूरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल, दाखविलेल्या मानवतेच्या भावनेबद्दल मी पोलंडच्यावतीने आभार मानतो. येथे होणारे संग्रहालय हे मानवतेचे प्रतिक असेल”. या भावनिक नात्याबरोबरच पोलंड भारतातील विशेषत: कोल्हापूर परिसरातील उद्योगामध्ये आदान-प्रदान करेल. वार्सा ते दिल्ली नंतर मुंबई व पुणे येथेही थेट हवाई वाहतूक सुरु केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
चमका कोल्हापूर हमारा….
“नमस्ते कोल्हापूर ! मेरे भाईयों और बहनों आज का लम्हा बहुत बहुत महत्वपूर्ण है”, असे सांगत राजदूत ॲडम बूरॉकोस्की यांनी हिंदीत भाषणाला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देशाची झालेली हानी आणि आशा काळात भारताने विशेषत: कोल्हापूरकरांनी मानवतेच्या भावनेतून दिलेला आश्रय आणि संरक्षण या विषयी मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची एक कविता सादर केली. “दीप बुझे पश्चिमी गगन के, व्याप्त हुआ बर्बर अंधियारा, किंतु चिर कर तम की छाती, चमका हिंदुस्था हमारा” असे सांगून चमका कोल्हापूर हमारा असे उच्चारताच उपस्थितानी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.