इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अधिकाऱ्यांमध्ये कर्तापुर कॉरिडॉरच्या संबंधातील तांत्रिक बाबींवर आज चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये कलम 370 चा निर्णय घेण्यात आल्यानंतर झालेली ही पहिली चर्चा होती. दोन्ही देशांच्या सीमेवर ही बैठक घेण्यात आली. त्याला दोन्ही बाजूंचे प्रत्येकी पंधरा अधिकारी उपस्थित होते.
सध्या काश्मीरच्या विषयावरून दोन्ही देशांत मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तथापी कर्तारपुर कॉरिडॉरचा प्रकल्प पुर्ण करण्याचा निर्धार पाकिस्तानी बाजुकडून व्यक्त करण्यात आला आहे. गुरूनानक यांच्या 550 व्या जयंतीच्या दिनी हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा अशी आमचीही इच्छा आहे असे पाकिस्तानने नमूद केले आहे. हा प्रकल्प शिख भाविकांसाठी महत्वाचा आहे. गुरू नानक यांची जयंती नोव्हेंबर महिन्यात आहे. त्यावेळी हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा इरादा आहे. हा कॉरिडॉर चार किमीचा आहे. त्याचे बरेचसे काम पुर्ण होत आले आहे.