नवी दिल्ली – भारताला कधीच कोणत्याही देशासोबत युद्ध नको आहे. शेजारील राष्ट्रांसोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारत आणि चीनमध्ये पहिल्यापासूनच सीमेवर वाद होत आला आहे.
पेट्रोलिंग करताना बऱ्याचवेळा चिनी आणि भारतीय सैन्यात वाद झाला आहे. मात्र, यावेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे. चीनसोबत चर्चा सुरू असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. दरम्यान, भारत-चीन सीमावाद पुन्हा उफाळून आल्याने तणाव वाढला आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, भारत आपल्या सीमाभागात इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते तयार करत आहे. यावर चीनला आक्षेप आहे. मात्र, सीमाभागात सुरक्षेसाठी, इथल्या नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून डेव्हलपमेंट करणे हा देशाचा पूर्वीचाच निर्णय आहे. भारत आपल्या देशात काहीही करू शकतो. तो आमचा निर्णय आहे. चीन देखील त्यांच्या सीमाभागात काहीही करू शकतो. आमचे काहीच म्हणणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्याची भूमिक मांडली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणतीच चर्चा झाली नसल्याचे माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच नेपाळ सोबत कुठे काही गैरसमज असतील तर ते चर्चेद्वारे नक्कीच दूर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.