नवी दिल्लीः भारत आणि चीन यांच्यातील वाद चांगलाच चिघळला होता मात्र आता यावर चर्चेतून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. त्यामुळेच आज बदोन्ही देशांचे लष्करप्रमुख चर्चा करणार आहेत. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे हद्दीत चीनी सैन्याच्या लष्करी हालचाली वाढल्याने भारत आणि चीनदरम्यान तनाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही देशांनी आपल्यातील मतभेदांना वादामध्ये रुपांतरीत न करता चर्चेतून मार्ग काढण्यावर भर दिला आहे. दोन्ही देशांच्या संवेदनशील बाबी, चिंता आणि अपेक्षांचा सन्मान करत चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यावर दोन्ही देश तयार झाले आहेत.
आज भारत आणि चीनच्या लष्काराचे कोअर कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांची याबाबत एक बैठक होणार आहे. ही बैठक चीनच्या मोलडो-चुशूल स्थित बीपीएम हटमध्ये होणार आहे. भारताकडून या बैठकीचे नेतृत्व लेफ्टनेंट जनरल हरिंदर सिंह करणार आहेत.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेत दोन्ही देशांचा भावनांचा आदर केला पाहिजे यावर एकमत झाले. परस्पर सामंजस्यातून आणि शांततेने चर्चा करुन तणावावर तोडगा काढला पाहिजे यावरही अधिकाऱ्यांचे एकमत झाले. चर्चेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी पूर्वग्रह बाजूला सारुन मोकळ्या वातावरणात चर्चा पार पडणे अपेक्षित आहे अशी भावना दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या तणावासंदर्भात दोन्ही देशांच्या नेत्यांनी भारत आणि चीनदरम्यान शांतीपूर्ण, स्थिर आणि संतुलित संबंध ठेवणं आवश्यक आहे. जागतिक स्तरावर देखील यामुळे एक सकारात्मक संदेश जाणार आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वांच्या मार्गदर्शनात मतभेदांबाबत शांतीपूर्ण चर्चा करुन दूर करणे गरजेचे आहे. ही चर्चा करताना संवेदनशील बाबी, चिंता आणि अपेक्षांचा सन्मान केला जाईल आणि यामुळे विवाद टाळला जाईल.
तर दुसरीकडे चीनी परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी, दोन्ही देश एकमेकांसाठी संकट तयार करणार नाहीत. तसंच मतभेदांना वादाचं रुप दिलं जाणार नाही असे म्हटले.तसेच या चर्चेदरम्यान कोविड-19 महामारीच्या संकटाबाबत सहयोगाबाबत आपले विचार मांडले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.