– रामचंद्र सोनवणे
राजगुरुनगर(प्रतिनिधी) : राजगुरूनगर जवळील खेड घाटातील इंदिरा पाझर तलाव १०० टक्के भरल्याने शेतकरी सुखावला आहे. या तलावातून पाणी पुरवठा होणारे सांडभोरवाडी, तिन्हेवाडी पेठ या गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेड तालुक्यात यावर्षी पावसाने दडी दिली होती. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी पडला आहे तालुक्यातील कळमोडी वगळता चासकमान धरण, भामा आसखेड धरण अजूनही भरलेली नाहीत. राज्यात सर्वच धरणे भरली आहेत. मात्र खेड तालुक्यातील धरणे अजूनही भरली नाहीत. मागील आठवड्यात भीमाशंकर परिसरात जोराचा पाऊस झाल्याने भामा आसखेड, चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ही दोन्ही धरणांमध्ये ९० टक्क्याच्या आसपास पाणी साठा जमा झाला आहे.
मागील आठवड्यात झालेल्या जोराच्या पावसामुळे खेड तालुक्यातील धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून तालुक्यातील विविध गावातील पाझर तलाव, शेततळी आणि विहिरी भरल्या आहेत. खेड तालुक्यातील कडूस मिनी धरण, राजगुरुनगरचा इंदिरा पाझर तलाव, जैदवाडी, रेटवडी, टोकावडे, गुळाणी, पाईट परिसरातील तलाव भरले आहेत. यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई चिंता मिटली आहे. पूर्व भागातील काही वाड्या-वस्त्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मार्गी लागला आहे.
खेड घाटातील पाझर तलाव भरल्याने परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व आसपासच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तलावाच्या परिसरात असलेल्या वनविभागातील पक्षी आणि इतर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तलाव भरल्याने राजगुरूनगर शहरातील नागरिक फिरायला येत आहेत. मात्र करोनाच्या संकटामुळे येथे येणाऱ्या नागरिकांनी शासनाचे नियम अटीचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. करोना विषाणू संसर्ग काळात येथे वर्षाविहार करण्यासाठी येण्याचे टाळावे असे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे