मुंबई -कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या अटकेवरून शिवसेनेने भाजप आणि उत्तरप्रदेश सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच, प्रियंका यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचे म्हणत त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. झुंजार वृत्तीच्या प्रियंका यांच्या डोळ्यांत आणि आवाजात त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची धार आहे, असे शिवसेनेने म्हटले.
लखीमपूर खेरी हिंसाचार आणि प्रियंका यांच्या अटकेवरून शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाष्य करण्यात आले. कॉंग्रेसच्या सरचिटणीस म्हणून प्रियंका यांच्यावर राजकीय स्वरूपाचे हल्ले होऊ शकतात.
पण, देशासाठी असीम त्याग करणाऱ्या आणि पाकिस्तानचे तुकडे करणाऱ्या महान इंदिरा गांधी यांच्या त्या नात आहेत याचे भान त्यांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते. लखीमपूर खेरीत जाण्यापासून छत्तिसगढ आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही रोखण्यात आले. हे काय भारत-पाकिस्तान युद्ध सुरू आहे काय?
आपल्याच देशातील दोन मुख्यमंत्र्यांना रोखणे हा संघराज्यातील विचित्र प्रकार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा रक्त महोत्सव म्हणायचा का, असा जळजळीत सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.